मजुरांना ३०० रुपये मजुरी देऊनही मनुष्यबळाची कमतरता
निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण परिसरात सध्या हरभरा, गहू काढणीच्या कामांना वेग आला आहे. वाढता उन्हाचा तडाखा आणि मजुरांची तीव्र टंचाई यामुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक हार्वेस्टर यंत्राद्वारे काढणी करण्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वेळ आणि श्रमाची बचत होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सध्या गव्हाच्या काढणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. पूर्वी गव्हाची कापणी, मळणी करण्यासाठी मजुरांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता मजूर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. वाढत्या उन्हामुळे शेतात काम करण्यास मजूर कचरत असून मजुरांना ३०० रुपये रोजंदारी देऊनही मनुष्यबळ मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी हार्वेस्टरच्या माध्यमातून काही तासांतच मळणीची कामे पूर्ण करत आहेत. परिणामी आगामी काही दिवसांत परिसरातील गव्हाचा हंगाम संपण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
——————————————————————–
‘निपाणीसह परिसरात वेदगंगा आणि दूधगंगा नद्यांना बारमाही पाणी उपलब्ध असल्याने रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारीची पेरणी करण्यात आली होती. गहू आणि हरभरा काढणीस आल्याने या भागात पंजाब व हरियाणा राज्यांसह महाराष्ट्रातील हार्वेस्टर यंत्रधारक दाखल झाले आहेत. यंत्राद्वारे काढणीसाठी एकरी सुमारे दोन हजार रुपये खर्च येत असल्याने उत्पादन कमी आणि खर्च अधिक होत आहे.’
-रावसाहेब जनवाडे, शेतकरी, बेनाडी
Belgaum Varta Belgaum Varta