
भिमापुरवाडीत अखंड हरिनाम सप्ताला प्रारंभ
निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात प्रत्येकाला कामातून वेळ मिळेनासा झाला आहे. शिवाय कामातील ताणतणावामुळे अनेक व्याधी घडत आहेत. त्यापासून दूर राहण्यासाठी साधू संतांच्या सहवासात काही वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. त्यांच्याकडून मिळणारी शक्ती वेगळी असून प्रत्येकाने त्यासाठी भक्ती केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये देव असून त्याला ओळखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. म्हणून दानधर्म परोपकार करणे आवश्यक आहे. तरच मन शांती मिळणार आहे, असे मत माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर-पवार यांनी व्यक्त केले.
भीमापूरवाडी येथील श्रीराम मंदिरात चैत्र शुध्द पौर्णिमे निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी वडर बोलत होते.
गळतगा पीकेपीएसचे अध्यक्ष संजय कागे, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन उद्योजक सुखदेव साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण, खडकलाट येथील अशोक यादव, खडकलाट, ममदापूर येथील पांडुरंग हरेल, गळतगा ग्रामपंचायत अध्यक्ष राजू पाटील यांच्या हस्ते विना पूजन झाले. जत्राट येथील श्रीधर महाराज, उद्योजक वसंत धारव, अनुसया बेलेकर यांच्या हस्ते ग्रंथ पूजन, ममदापूर येथील इंगळे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्या शाराबाई सुतार, मिथून पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
सोहळा काळात दररोज पहाटे काकड आरती, सकाळी हरी भजन, दुपारी भोजन विश्रांती, सायंकाळी हरिपाठ, कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे. सोहळा काळात श्रीधर महाराज-जत्राट, ज्ञानेश्वर महाराज- हेरवाड, नदाफ महाराज -यळगुड,पन्हाळकर महाज -उत्तूर यांची प्रवचन व कीर्तन सेवा होणार आहे. रविवारी (ता.५) सकाळी ज्ञानेश्वरी पारायण व अध्याय पठण पारायण होणार आहे. सोमवारी (ता.६) सकाळी सकाळी ७ वाजता दिंडी नगर प्रदक्षिणा, सकाळी ९ वाजता बाजीराव पाटील महाराज -सरवडे यांचे काल्याचे किर्तन, दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta