चार आरोपींना अटक : पोलिसांना २५ हजार रुपयाचे बक्षीस
निपाणी (विनायक पाटील) : निपाणी शहर व ग्रामीण भागातील दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण काही दिवसापासून वाढले होते. त्याची दखल घेऊन निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याने या चोराचा छडा लावला आहे. याप्रकरणी एकूण ४१ दुचाकींचा शोध घेतला असून सर्व दिवसाची पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ४१ दुचाकी सह २४ लाख ६० हजाराचा माल जप्त केला आहे. युवराज संभाजी पोवार (वय ३५ रा. कुर्ली), विनायक तानाजी कवाळे (वय.२८ रा. कुर्ली), दयानंद संभाजी शेटके (वय ३६ रा. हदनाळ) आणि तानाजी संभाजी शेटके (वय ३९ रा.हदनाळ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी दिलेली अधिक माहिती अशी, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ग्रामीण भागातील काही दुचाकी चोरीला गेल्या होत्या. दुचाकीस्वारांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हा पोलीस प्रमुख संजीवकुमार पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज एलीगार यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुमार कुंभार व सहकाऱ्यांनी सापळा रचून चारही आरोपींना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ४१ दुचाकी ज जप्त केले आहेत.
आरोपींनी सर्वच वाहनांचे नंबर प्लेट काढून टाकले आहेत. तर काही दिवसाची अत्यल्प दरात आपल्या नातेवाईकांना विक्रीही केली आहे अशा वाहनांचाही पोलीस शोध घेत आहेत. वरील सर्व आरोपींना निपाणी न्यायालयासमोर हजर करून हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस प्रमुखांनी तपास पथकाला २५ हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद झाली आहे.