माजी खासदार राजू शेट्टी : गळतगा येथील कार्यक्रमात मागणी
निपाणी (वार्ता) : वर्षानुवर्षे केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची कुचेष्टा सुरू आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. बारा महिने ऊस पिकवूनही त्यांना योग्य भाव दिला जात नाही. याशिवाय इतर पिकांचे भावही ठरलेले नाहीत. त्यामुळे सर्व पिकांना हमीभाव मिळावा, यासाठी शेतकरी बांधवांनी एकत्रित येण्याची गरज आहे. शिवाय शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत संघटना नेहमीच रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. या पुढील काळात दोन्ही संघटना एकत्रित कार्यरत राहणार आहेत. यंदा पर्यटन ऊसाला ५ हजार रुपये दर मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी घटस्थापने दिवशी सीमाभागात मेळावे घेण्यात येणार आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
गळतगा येथे रामलिंगेश्वर गणेश उत्सवाच्या २५ व्या वर्धापन दिननिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी चिकोडी जिल्हा रयत संघटना अध्यक्ष राजू पोवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार म्हणाले, निपाणी सीमाभागात शेतकऱ्यावरील होणारे अन्याय रोखण्यासाठी रयत संघटना नेहमीच रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. आता यापुढे काळात स्वाभिमानी संघटना आणि संघटना एकत्रितरित्या लढा देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जागृत राहून हमीभावासाठी एक संघपणे राहण्याची गरज आहे. तरच भविष्यात शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे. यापुढील काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि संघटना एकत्रितपणे लढा देणार असून त्याला शेतकऱ्यांनी पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी माजी खासदार राजू शेट्टी व रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते गणेशाची आरती झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रारंभी राजू शेट्टी व राजू पोवार यांच्या आगमनानिमित्त मंडळातर्फे मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी रयत संघटनेचे कलगोंडा कोटगेचिनू कुळवमोडे, सुभाष चौगले. राजू उपाध्ये, नानासो कुंभार. बापूसाहेब पाटील, पिंटू तेरदाळे, संभाजी केळवेकर, बाबासाहेब चेंडके, शिवानंद शिंदे, पिंटू तेरदाळे, राहुल कोळी, स्वामी सिद्ध, उदय चौगुले, अनिल धारव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व महिला प्रमाणात उपस्थित होती.