राज्य सरकारी नोकर संघाचे अध्यक्ष सी. एस. षडाक्षरी : निपाणीत सरकारी नोकर संघाची सभा
निपाणी (वार्ता) : सरकारी कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा देण्यासाठी संघटनेने काम केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सीमा भागातील दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. आपण नेहमीच सीमावाशीय सरकारी नोकरांच्या पाठीशी आहोत. या पुढील काळात सरकारी नोकरांनी जागृत राहून काम करणे गरजेचे आहे. लवकरच चिकोडी जिल्हा करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही सरकारी नोकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष सी. एस. षडाक्षरी यांनी दिली.
येथील बस स्थानक जवळ असलेल्या आशीर्वाद मंगल कार्यालयात आयोजित राज्य सरकारी नोकर संघाच्या सभेत ते बोलत होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सरकारी नोकर संघाचे निपाणी तालुका अध्यक्ष एम. वाय. गोकार यांनी स्वागत केले. यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या संजय मगदूम, प्रकाश पूर्वे, ताई आरेकर, सी. एस. पाटील, अवण्णा पुजारी, जे. डी. पाटील या शिक्षकांचा षडाक्षरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राज्याध्यक्ष षडाक्षरी म्हणाले,कोणतीही योजना योजना तळागाळातील गरजूंपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे असते. हेच काम सरकारी कर्मचारी करत आहेत. प्रशासकीय व्यवस्थेत कर्नाटक राज्य देशात आदर्श ठरले आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे.
गरजूंना सरकारी सुविधांचा लाभ देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना अनेकदा समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या दूर करण्यासाठी संघ काम करत आहे. कामानिमित्त बेंगळूरला येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी १५ कोटी रुपये खर्चून स्वतंत्र भवन बांधले आहे. केजीआयडीअंतर्गत ऑनलाइन कर्जाची व्यवस्था केली आहे. कर्मचाऱ्यांना आगाऊ म्हणून दहा हजार रुपये मिळत होते. ही रक्कम २५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्यांना बाळंतपणात सहा महिन्यांपर्यंत पगारी रजेची व्यवस्था केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा तसेच सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत.
सरकारी कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या आजारावर कॅशलेस सुरुवात उपचार सुविधा मिळावी,यासाठी मोफत सरकारी नोकर आरोग्य योजना जारी होत आहे. अशाप्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारण्यासाठी कटिबद्ध आहोत. कर्मचाऱ्यांनीही आपल्या सेवेची गती कमी होऊ देऊ नये. चिंतेला शेवट नाही. अशावेळी आशेला मर्यादा घातल्या तरच चिंता कमी होईल, असे सांगितले. गटशिक्षणाधिकारी रेवती मठद यांनी, सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग व नवी पेन्शन योजना रद्द करणे या दोन प्रमुख मागण्या आहेत. याबरोबरच कर्मचाऱ्यांना मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले.
सभेस राज्य सरकारी नोकर संघाचे जिल्हा अध्यक्ष बसवराज रायव्वगोळ, गिरीश चिटणीस, शिवानंद कुडसोमण्णवर, नोकर संघाचे सौंदत्ती तालुका अध्यक्ष आनंद मुगबसव, श्रवण रानवगोळ, रमेश दोड्डगौडर, बी ए कुंभार गौडप्पा सड्डी, आनंद हंजागोळ, शिक्षक संघाचे जिल्हा खजिनदार विनायक गुरव, विजय पाटील, शिक्षक संघाची तालुका अध्यक्ष भास्कर स्वामी, एससीएसटी शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष सुनील शेवाळे, अविनाश होळेप्पगोळ, सीडीपीओ के. सुमित्रा, एस. डी. गंगन्नावर, अभियंता श्रीमंत कांबळे, बसवराज मुरगोड, रमेश अरकेरी तेजस्वी बेळगाली विद्यावती जनवाडे, बी.एच. लंगोटी, रावसाहेब जनवाडे, सदाशिव कुंभार, सोमनाथ पुजारी, विनायक गुरव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. पी. एम. कल्लोळी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta