Sunday , September 8 2024
Breaking News

हैदराबाद – गुजरात सामना पावसामुळे रद्द; हैदराबाद प्लेऑफ्समध्ये दाखल तर दिल्ली शर्यतीतून बाहेर

Spread the love

 

सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे वाया गेला. सततच्या पावसामुळे मैदान संपूर्ण वेळ कव्हरने झाकले गेले होते. त्यामुळे सामना अधिकाऱ्यांनी सामना रद्द केला. ज्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफ्समध्ये पोहोचला आहे. हा सामना रद्द झाल्यामुळे हैदराबाद आणि गुजरात या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. हैदराबादचे आता १३ सामन्यांतून १५ गुण झाले आहेत आणि संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नई सुपर किंग्ज वगळता इतर कोणत्याही संघाला १५ किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळू शकत नाहीत. या स्थितीत हैदराबादचा संघ प्लेऑफ्ससाठी पात्र ठरला.

हैदराबादचा संघ प्लेऑफ्ससाठी पात्र ठरला

हैदराबाद आणि गुजरात यांच्यातील सामना हैदराबादच्या उप्पल स्टेडियमवर होणार होता, मात्र मुसळधार पावसामुळे नाणेफेक होऊ शकली नाही. पाऊस थांबत नव्हता आणि शेवटी रात्री साडेदहा वाजता शेवटची वेळ निश्चित करण्यात आली की पाऊस थांबल्यास दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी पाच षटकांचा सामना खेळवला जाईल. उप्पल स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेट चाहत्यांची मात्र हवामानाने निराशा केली. त्यामुळे शेवटी रात्री साडेदहा वाजता अधिकृतपणे रद्द झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यामुळे विभागून मिळालेल्या एका गुणाच्या जोरावर हैदराबादचा संघ प्लेऑफ्ससाठी पात्र ठरला.

दिल्ली प्लेऑफ्समधून बाहेर

सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्याने याचा फटका अन्य दोन संघांना बसला आहे. प्लेऑफ्सबाबत बोलायचे झाले, तर दिल्ली कॅपिटल्स संघ कोंडीत अडकला होता, जो प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. बंगळुरू आणि लखनऊचे प्रत्येकी १२ गुण आहेत. तथापि, लखनऊचा निव्वळ धावगती खूपच नकारात्मक आहे आणि त्याची भरपाई करणे त्यांच्यासाठी कठीण होईल. अशा स्थितीत चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यातील सामना आभासी नॉकआऊट मानला जात आहे. पण गुजरात विरुद्धचा सामना पावसाने रद्द झाल्यामुळे हैदराबादला एक गुण मिळाला आहे आणि त्याचे एकूण १५ गुण झाले आहेत. दिल्ली आणि लखनऊ १५ गुणांपर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे, हैदराबाद आता आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये जाणारा तिसरा संघ बनला आहे. त्याआधी, केकेआर (१९) आणि राजस्थान रॉयल्स (१६) यांनी आधीच टॉप-४ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

पावसाने व्यत्यय आणलेला तिसरा सामना ठरला
पावसाने व्यत्यय आणलेला या मोसमातील हा तिसरा सामना आहे. यापूर्वी कोलकाता आणि मुंबई यांच्यातील सामन्यावरही पावसाचा परिणाम झाला होता. हा सामना दोन तास १५ मिनिटे उशिराने सुरू झाला आणि तो १६-१६ षटकांचा होता. त्याचवेळी गुजरातचा कोलकातासोबतचा मागील सामना पावसामुळे वाया गेला होता. ज्यामुळे गुजरात टायटन्सचा संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडला. त्याबरोबर हैदराबाद-गुजरात सामना पावसामुळे वाहून गेलेला दुसरा सामना ठरला आहे.

About Belgaum Varta

Check Also

विनायक नगर येथे दुचाकी जाळण्याचा प्रकार

Spread the love  बेळगाव : विनायक नगर येथे सोमवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास घरासमोर लावण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *