

बंगळूर : बनावट मतदार हटवण्यासाठी एका डेटा सेंटर ऑपरेटरला प्रत्येकी ८० रुपये देण्यात येत होते, असे आळंद विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील कथित अनियमिततेची चौकशी करणाऱ्या कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) आढळून आले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर केलेल्या “मत चोरी”च्या आरोपात या प्रकरणाचा उल्लेख केला आहे. एसआयटीनुसार, डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मतदारांची नावे वगळण्यासाठी ६,०१८ अर्ज सादर करण्यात आले असून, या प्रक्रियेसाठी सुमारे ४.८ लाख रुपयांचा व्यवहार झाला.
गेल्या आठवड्यात एसआयटीने भाजप नेते आणि माजी आमदार सुभाष गुत्तेदार, त्यांचे पुत्र हर्षानंद आणि संतोष तसेच त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट मल्लिकार्जुन महांतगोळ यांच्या गुलबर्ग्यातील निवासस्थानांवर छापे टाकले. या कारवाईत सात लॅपटॉप आणि अनेक मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, पेमेंटसाठी वापरल्या गेलेल्या निधीचा मागोवा घेतला जात आहे.
तपास पथकाने २६ सप्टेंबर रोजी सीआयडीच्या सायबर क्राइम युनिटकडून तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी गुलबर्गा जिल्ह्यातील एका डेटा सेंटरला “हब” म्हणून ओळखले, जिथून मतदार वगळण्याच्या विनंत्या पाठवल्या गेल्या होत्या.
एसआयटी प्रकरणाचा शोध स्थानिक रहिवासी मोहम्मद अशफाक यांच्या चौकशीतून लागला. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याचे नाव या प्रकरणात आले होते. चौकशीनंतर त्याने निर्दोष असल्याचा दावा करत आपली इलेक्ट्रॉनिक उपकरणे अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचे आश्वासन दिले होते.
डेटा सेंटर ऑपरेटरना निवडणूक आयोगाच्या (ईसी) पोर्टलवर अनधिकृत प्रवेश कसा मिळाला आणि ज्या अधिकाऱ्यांची ओळखपत्रे वापरली गेली, त्यांना याची कल्पना का नव्हती, याचा एसआयटी सध्या तपास करत आहे.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना माजी आमदार सुभाष गुत्तेदार यांनी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. “बी. आर. पाटील हे वैयक्तिक आणि राजकीय फायद्यासाठी हे आरोप करत आहेत. मंत्रीपद मिळवण्यासाठी ते राहुल गांधींची मर्जी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे गुत्तेदार म्हणाले.
मतदार यादीतील फेरफार प्रकरणाची एसआयटीची चौकशी सुरू असून, पुढील काही दिवसांत अधिक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
………………………
देसाई
Belgaum Varta Belgaum Varta