

बंगळूर : राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने पुढील शैक्षणिक वर्षापासून एआय-आधारित चेहरापहिचान (फेशियल अटेंडन्स) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात विभागाने परिपत्रक जारी केले आहे.
मोबाइल ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली जाणार असून, ई-शासन पद्धतीने ही योजना राबवली जाईल. याबाबतची घोषणा मागील अर्थसंकल्पात करण्यात आली होती. चेहरापहिचान तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवून ती थेट विभागाच्या सर्व्हरवर व पालकांच्या मोबाईलवर पाठवली जाईल.
या प्रणालीचा विस्तार शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंतही करण्यात येणार आहे. त्यामुळे विनाकारण शाळा बुडविणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांवरही नियंत्रण येणार आहे.
कोविड काळात उपस्थितीबाबत शिथिलता देण्यात आली होती. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी शाळा बुडविण्याची सवय लावून घेतल्याचे निदर्शनास आले. नव्या व्यवस्थेमुळे दररोज किती विद्यार्थी उपस्थित होते, याची अचूक माहिती विभागाला मिळणार असून, अनुपस्थितीची माहिती पालकांना तत्काळ संदेशाद्वारे दिली जाईल.
कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेत सवलत देण्याबाबतही विभाग विचार करत आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून ही योजना राज्यातील सर्व सरकारी व अनुदानित शाळांत लागू होणार आहे. सुमारे २.१६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, मे महिन्याच्या अखेरीपर्यंत मोबाइल ऍपची अंमलबजावणी पूर्ण करण्याच्या सूचना स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.


Belgaum Varta Belgaum Varta