मंत्री अशोक; बेळगावसह चार ठिकाणी एनडीआरएफची पथके
बंगळूर : कर्नाटकात मान्सूनपूर्व पावसामुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगून पावसाच्या आपत्ती निवारणासाठी सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला (एनडीआरएफ) ची चार पथके तैनात करणार आहे, असे महसूल मंत्री आर. अशोक यांनी सांगितले. दरम्यान, कांही भागात पवसाचा जोर कमी झाला असला तरी अद्यापही धोका टळलेला नाही.
चिक्कमंगळूर, दक्षिण कन्नड, उडुपी, कोडगू, शिमोगा, दावणगेरे, हासन आणि उत्तर कन्नड या जिल्ह्यांच्या उपायुक्तांसोबत बैठक घेऊन अशोक यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अशोक म्हणाले, आतापर्यंत २०४ हेक्टर शेतीचे आणि ४३१ हेक्टरवरील बागायती पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. तब्बल २३ घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे.
एनडीआरएफच्या चार तुकड्या दक्षिण कन्नड, कोडगू, बेळगाव आणि रायचूर येथे तैनात असतील. एक वेगळी टीम बंगळुरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवेल, असे ते म्हणाले.
दरम्यान, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) टीम देखील मान्सून-संबंधित संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. पूर किंवा भूस्खलनाच्या वेळी तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक स्टँड बाय वाहन तयार ठेवावे, असे अशोक यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
घरांचे व पशुधनाचे नुकसान झाल्यास ४८ तासांत नुकसान भरपाई मिळावी, असे निर्देश मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्यातील कांही भागात शुक्रवारी पावसाचे प्रमाण कांहीसे कमी झाले तरी दक्षिण कर्नाटक, मलनाड, किनारपट्टी प्रदेश आणि उत्तर कर्नाटकातील कांही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पाडत आहे.
विजांच्या कडकडाटाने राज्यभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिमोगा जिल्ह्याला प्रतिकूल हवामानाचा सर्वाधिक फटका बसला. बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. शहरातील पूरग्रस्त रस्त्यांवरून वाहतूक करताना वाहनधारकांची दमछाक झाली. शिमोगा येथील स्थानिक प्रशासनाने गुरुवारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. स्मार्ट सिटीच्या अपूर्ण कामांमुळे अनेक रस्त्यांचे चिखलात रुपांतर झाले आहे.
संततधार पावसाने जुन्या म्हैसूर भागातील अनेक जलकुंभ भरले आहेत. हुनसूर तालुक्यातील लक्ष्मण तीर्थ नदीच्या कोडगूच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे. म्हैसूर जिल्ह्यातील अलिग्रामाजवळ कालव्याला तडा गेल्याने सुपारी, केळी आणि नारळाची अनेक एकर लागवड पाण्याखाली गेली आहे. म्हैसूर येथील विडी कामगार वसाहतीमधील ८० हून अधिक घरे पाण्याखाली गेली आहेत
हरंगी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने पाणी पातळी वाढली आहे. जलसाठा कमाल पातळी गाठण्यासाठी फक्त नऊ फूट कमी आहे. गेल्या २४ तासांत मडिकेरी शहरात ९ सेमी पावसाची नोंद झाली आहे.
हसन आणि चिक्कमंगळूर जिल्ह्यांतील अनेक भागांत गुरुवारी जोरदार पाऊस सुरूच होता. जुळ्या मलनाड जिल्ह्यात संततधार पावसाने शेकडो एकरातील पिकांचे नुकसान झाले आहे.
उत्तरेकडे, अनेक जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्रीपासून अविरत पाऊस पडत आहे. मात्र, बहुतांश भागात पावसाचा जोर कमी आहे. अविरत पावसाने या प्रदेशातील तलाव पाण्याने भरले आहेत, परंतु उलटपक्षी यामुळे शेकडो एकरवरील कापणी आणि काढणीस तयार पिकांचे नुकसान झाले आहे. उत्तर कन्नडमधील सुकविण्यासाठी ठेवलेला कित्तेक टन मका पावसात खराब झाला.
कोप्पळ, विजयनगर, बळ्ळारी, दावणगेरे आणि चित्रदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे अनेक शाळांच्या इमारती आणि घरांचे नुकसान झाले.
गुरुवारी कल्याण कर्नाटक जिल्ह्यांमध्ये विजेच्या धक्क्याने एका महिलेसह दोन शेतकरी आणि अनेक जनावरांचा मृत्यू झाला.
दुसर्या घटनेत, यादगीर जिल्ह्यातील हुनसगी तालुक्यातील होरट्टी येथे भीमप्पा कोडली (वय ६२) हे त्यांच्या शेतातील झाडाखाली आश्रय घेत असताना वीज कोसळून मरण पावले. कांही जनावरेही दगावल्याचे वृत्त आहे.
राज्यात येणार्या एनडीआरएफ पथकाची जबाबदारी
१. दक्षिण कन्नड – दक्षिण कन्नड, उडुपी, उत्तर कन्नड आणि परिसर
२. कोडगू – म्हैसूर, हसन, चिकमंगळूर
३. बेळगाव – बागलकोट, विजयपुर आणि आसपासचा परिसर
४. रायचूर – यादगिरी. बळ्ळारी, गुलबर्गा व आसपासचा परिसर
५. बंगळूरात एक स्वतंत्र पथक कार्यरत
Belgaum Varta Belgaum Varta