बेेंगळुरू : मुख्यमंत्री कोणी व्हायचे हे जनता ठरवेल. लोक निर्णय घेण्यापूर्वीच मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा करत आहेत, असा टोला आज डी. के. शिवकुमार, सिद्धरामय्या आणि एचडीके यांना मुख्यमंत्र्यांनी लगावला.
वक्कलिगा समाजाच्या मुख्यमंत्र्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोम्मई यांनी आज गुरुवारी मंड्या जिल्ह्यातील केआरपेटे येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे. मुख्यमंत्री कोण व्हावे हे लोक ठरवतात, ते यांना ठरवता येत नाही. डीकेशी आणि सिद्धरामय्या या दोघांमधील वैर सर्वश्रुत आहे, असा टोला त्यांनी हाणला.
कुमारस्वामींच्या विधानाबद्दल बोम्मई म्हणाले, ते सुरुवातीपासूनच म्हणत आहेत की ते पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. ते म्हणतात मला आणखी एक संधी द्या. शिवकुमार म्हणत आहेत की यावेळी संधी आहे, मला द्या. लोक अंतिम निर्णय घेण्यापूर्वी ते अशी स्पर्धा करत आहेत. लोक या सर्व गोष्टींचे निरीक्षण करत असून अंतिम निर्णय लोकच घेतील, असे ते म्हणाले.
मी लवकरच दिल्लीला जाणार आहे. दिल्ली दौर्यानंतरच निगम-महामंडळांच्या नियुक्त्या अंतिम होणार आहेत असे सांगून दिल्लीला गेल्यावरच मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर चर्चा करू, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी माध्यमांच्या प्रश्नावर स्पष्ट केले.