भाजपच्या बैठकीत निर्धार, निवडणुकीसाठी भाजपची रणनीती
बंगळूरू : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजप प्रदेशाध्यक्ष नळीनकुमार कटील यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके राज्यातील प्रत्येकी ५० विधानसभा मतदारसंघांचा दौरा करतील आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची तयारी करतील, असा निर्णय आज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
प्रदेश भाजपचे प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यालयात झालेल्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नेत्यांचा दौरा आणि जनोत्सव संमेलनाबाबत निर्णय घेण्यात आला.
पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना भाजपचे मुख्य प्रवक्ते एम. जी. महेश म्हणाले की, कर्नाटकातील प्रत्येक बूथचे किमान ५० पेक्षा अधिक मते मिळवणाऱ्या बूथमध्ये रुपांतर करण्यात यावे. ते म्हणाले की, पक्षाच्या राज्य आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांना महिन्यातून १५ दिवस प्रवास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली दोन्ही नेत्यांचे पथक येत्या एक महिन्यात प्रत्येकी ५० विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. आजच्या बैठकीत यावर चर्चा होणार असून सायंकाळपर्यंत दौऱ्याच्या तारखा निश्चित होतील, असे त्यांनी सांगितले.
जनोत्सव
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत राज्याच्या ७ भागात भव्य जनोत्सव संमेलन घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जनोत्सवाचे पहिले अधिवेशन दोड्डबळ्ळापूर येथे होणार असून, त्यानंतर इतर सात ठिकाणी संमेलने होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील निवडणुकीत १४५ हून अधिक जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाच संकल्प आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या पाच योजनांचा वापर करून या योजना घरोघरी पोहोचविण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रदेश प्रभारी अरुण सिंह आणि पक्षाचे अध्यक्ष नळीनकुमार कटील सहभागी झाले होते.
पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट करून भाजपचे प्रदेश प्रभारी अरुण सिंह यांनी उद्घाटनाच्या भाषणात सांगितले की, पक्षाचे नेते पक्षाचे व्यासपीठ सोडून इतरत्र बोलले तर ती बेशिस्त मानली जाईल. कोणत्याही नेत्याने पक्षाचे नुकसान होईल असे वक्तव्य करू नये. एम. जी. महेश म्हणाले की, अनुशासनहीनता खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
रायचूरचे भाजप आमदार शिवराज पाटील यांनी जिल्ह्यात विकास कामे होत नसल्याच्या आणि जिल्ह्याचा तेलंगणात समावेश करावा असे केलेल्या वक्तव्याची पक्षाने गांभीर्याने दखल घेतली असल्याचे ते म्हणाले.
बैठकीच्या सुरुवातीला माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी.एल. संतोष यांची केंद्रीय संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीवर झालेल्या नियुक्तीचे सर्वानुमते स्वागत करण्यात आले, अरुणसिंग म्हणाले की, येडियुरप्पा यांच्या नियुक्तीमुळे दक्षिण भारतात भाजपला हत्तीचे बळ मिळेल असे अरुण सिंग यांनी सांगितले.
यावेळी राज्याच्या कार्यकारिणीची बैठक येत्या १० व ११ सप्टेंबरला बंगळुरू येथे घेण्याचे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.