प्रा. तुकाराम गडकरी : ‘महात्मा बसवेश्वर’तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेने सहकाराबरोबरच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. औद्योगिक क्रांतीतून रोजगार निर्मिती झाली. पण आता आयटी क्रांतीमुळे रोजगार जात आहेत. त्यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार शिक्षण देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढली आहे. त्यामुळे शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांना अधिक ज्ञानदानापेक्षा त्यांच्याकडून स्वयंअध्ययन करून घेणे गरजेचे आहे, असे मत प्रा. तुकाराम गडकरी यांनी केले.
येथील महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेतर्फे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील पहिली ते दहावीतील गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. बी कुरबेट्टी होते. समाधी मठातील प्राणलिंग स्वामी यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम झाला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन झाले. प्रा. मिथुन अंकली यांनी, महात्मा बसवेश्वर संस्थेने गरीब सभासदांच्या पाल्यांच्या शैक्षणिक विकासात मोलाची भर घातली आहे. शैक्षणिक जीवनात वेळेचे पालन, कामाच्याप्रति निष्ठा, संस्कार, चांगली वाणी, नम्रता, प्रामाणिकपणा आणि आरोग्य विषयक जागरूकता यावर भर देण्याचे आवाहन केले. डॉ. कुरबेट्टी यांनी, संस्थेच्यावतीने केवळ आर्थिक व्यवहार न करता सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सभासदांच्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी काम केले जात असल्याचे सांगितले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, संचालक श्रीकांत परमणे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास केएलई संस्थेचे संचालक अमर बागेवाडी, संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शेट्टी, संचालक डॉ. एस. आर. पाटील, किशोर बाली, प्रताप पट्टणशेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, सदानंद दुमाले, सदाशिव धनगर, दिनेश पाटील, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सीईओ एस.के आदण्णावर, विद्या कमते, भद्रेश फुटाणे, महेश शेट्टी यांच्यासह संचालक, सभासद, विद्यार्थी उपस्थित होते. सुजाता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सुरज घोडके यांनी आभार मानले.