
बेळगाव : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे झालेल्या केसरेकर दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, तसेच आई-वडिलांच्या निधनामुळे अनाथ झालेल्या दोन मुलांना शासकीय मदत व कायदेशीर संरक्षण द्यावे, अशी मागणी समस्त मराठा समाज बेळगावच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली.
या मागणीसाठी शिष्टमंडळाने सोमवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन साद केले.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हेब्बाळ गावचे मूळ रहिवासी असलेले मोहन नागाप्पा केसरेकर (४५) आणि त्यांच्या पत्नी मनीषा मोहन केसरेकर (३५) हे उपजीविकेसाठी सांगलीतील कुपवाड एमआयडीसी परिसरात राहत होते. १५ ऑगस्ट २०२६ रोजी कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून शेजारी राहणाऱ्या फरीद शेख याने चाकू आणि हातोड्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहन आणि मनीषा केसरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांची दोन लहान मुले मनाली आणि मनोज आई-वडिलांच्या छत्रापासून वंचित झाली आहेत.
घटनेचा निषेध करत समस्त मराठा समाज बेळगावच्या शिष्टमंडळाने आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, खटला फास्ट-ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि कायद्यानुसार आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
तसेच, या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवून तातडीने दोषारोपपत्र दाखल करावे, अशी मागणीही करण्यात आली.
अनाथ मुलांच्या भवितव्याची जबाबदारी सरकारने घ्यावी
आई-वडिलांच्या निधनामुळे अनाथ झालेल्या मनाली आणि मनोज या दोन्ही मुलांचे पालकत्व राज्य सरकारने स्वीकारावे. तसेच प्रत्येक मुलाला दरमहा १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाने लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य फिर्यादी मनाली, तिचा भाऊ मनोज तसेच इतर प्रमुख साक्षीदारांच्या सुरक्षेचा प्रश्नही शिष्टमंडळाने उपस्थित केला. त्यांना शासकीय खर्चाने तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले.
या दुःखद घटनेत केसरेकर कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण समाज खंबीरपणे उभा असल्याचेही शिष्टमंडळाने स्पष्ट केले.
या शिष्टमंडळात रमाकांत कोंडूस्कर, गुणवंत पाटील, प्रा. आनंद आपटेकर, सागर पाटील, कपिल भोसले, नंदू इंदुलक, मोतेश बारदेशकर, विनायक बिरजे, विराज मुरकुंबी, निलेश मुतगेकर यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचा समावेश होता.

Belgaum Varta Belgaum Varta