बेळगाव : शहरा उपनगरातील कोणत्याही भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, वीजपुरवठा खंडित होणे यासह अन्य काही समस्या असल्यास त्याची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज मंगळवारी आयोजित महानगरपालिका व इतर विभागांच्या समन्वय बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, वीजपुरवठा खंडित होणे, पार्किंगची समस्या, अन्य कामांना होणारी दिरंगाई अशा विविध समस्यांना शहराला तोंड द्यावे लागत आहे. अशा वेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय साधून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात.
शहरात (24×7) पाणीपुरवठा प्रकल्पाची कामे सुरू असून, काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात तफावत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महापालिका, पाणी पुरवठा महामंडळ व मलनिस्सारण मंडळ, पाणी प्रकल्पाचे व्यवस्थापन करणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असेही ते म्हणाले.
सातत्यपूर्ण जलप्रकल्पाची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत. दरम्यान, रस्ते दुरुस्ती व इतर कामे प्राधान्याने हाती घेण्यात यावीत. पाऊस व वाऱ्यामुळे झाडे पडून वीजपुरवठ्यात समस्या निर्माण होणार आहे. अशा वेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ आवश्यक कामे तातडीने करावीत. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा करण्यासाठी कारवाई करावी.
याशिवाय पार्किंग व्यवस्थापनासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी एकमेकांना सहकार्य करून नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदा, महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी उपस्थित होते. या बैठकीला महापालिका, वनविभाग, हेस्कॉम, नागरी पाणीपुरवठा व मलनिस्सारण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.