बेळगाव : कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून 1 नोव्हेंबर काळ्या दिनाची सायकल फेरी व निषेध मोर्चा काढता आला नाही. मात्र यावर्षी अटक झाली तरी बेहत्तर पण सायकल फेरी बेळगाव शहरातून ठरलेल्या मार्गावरून निघणारच असा निर्धार शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला.
रंगुबाई पॅलेस येथे शहर समितीची बैठक शहर समितीचे उपाध्यक्ष बी. ओ. येतोजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
प्रशासनाच्या परवानगीची प्रतीक्षा न बघता काळ्यादिनी निषेध मोर्चा व सायकल फेरी काढणार त्यामुळे कार्यकर्त्यांनी संभ्रमात न राहता मोर्चात बहुसंख्येने उपस्थित राहावे व निषेध मोर्चा यशस्वी करावे, असे आवाहन प्रकाश मरगाळे यांनी केले.
सीमाभागातील मराठी माणूस गेल्या 65 वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्यासाठी लढत आहे. कोरोनामुळे दोन वर्षात सायकल फेरी काढता आली नाही. मात्र या वर्षी प्रशासनाच्या दडपशाहीला न जुमानता निषेध मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन मालोजीराव अष्टेकर यांनी केले आहे.
येत्या 23 नोव्हेंबरला सीमाप्रश्नी सर्वोच न्यायालयात सुनावणी आहे लोकेच्छा दाखवून देण्यासाठी काळ्य दिनी बहुसंख्य मराठी जनतेने मोर्चात सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले.
12 डिसेंबर रोजी होणाऱ्या सुवर्णसौध येथे होणाऱ्या अधिवेशनाला विरोध म्हणून सीमावासीयांचा महामेळावा घेण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला तसेच रिंगरोडसाठी बेळगांव परिसरातील सुपीक जमीन संपादन करण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे. याच्या विरोधात शेतकरी संघटना रस्त्यावरची लढाई लढत आहेत. त्यांच्या या लढ्याला शहर समितीने पाठिंबा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी विश्वनाथ सूर्यवंशी, मदन बामणे, अॅड. अमर येळ्ळूरकर, अमित देसाई, चंद्रकांत कोंडुसकर, रामा शिंदोळकर, श्रीकांत मांडेकर, रणजीत हावळ्ळाचे, प्रकाश नेसरकर, शिवानी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. येतोजी यांनी काळ्यादिनाची फेरी यशस्वी करण्याचे आवाहन केले. रणजीत चव्हाण-पाटील यांनी आभार मानले.
नगरसेवक रवि साळुंखे, शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, शिवराज पाटील, विकास कलघटगी, एपीएमसी माजी सदस्य महेश जुवेकर, उमेश पाटील आदी उपस्थित होते.