राहुल गांधींची बेळगावच्या जाहिर सभेत घणाघाती टीका
बेळगाव : राज्यातील विकास कामात 40% कमिशन घेतले जात असल्याचा आरोप कॉन्ट्रॅक्ट असोसिएशन ने केला आहे. या संदर्भात कॉन्ट्रॅक्ट असोसिएशन स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. मात्र त्या पत्राचे उत्तर पंतप्रधानांनी अद्यापही दिलेले नाही. कर्नाटकातील भ्रष्टाचारावर पंतप्रधान मूग गिळून गप्प असल्याची घणाघाती टीका, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी यांची आज सोमवारी बेळगावात युवा ध्वनी जाहिर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत राहुल गांधी यांनी राज्यातील भाजप सरकारच्या कारभारावर कडाडून टीका केली. भाजप सरकार राज्यातील तरुणांना रोजगार मिळवून देण्यात अपयशी ठरले आहे. कर्नाटकातील भाजप सरकारची ख्याती सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून झाली आहे. भाजपातील आमदार आणि मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणी उघडकीस आली आहेत. राज्यात भ्रष्टाचार वाढला आहे, युवकांना रोजगार मिळत नाहीत. मात्र यावर पंतप्रधान मोदी काहीच बोलत नाहीत असेही ते म्हणाले.
राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर येईल त्यावेळी, पाच वर्षात दहा लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले जातील. बेरोजगारांना दोन वर्षांसाठी दीड हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत मासिक भत्ता देण्यात येईल. सरकारी कोट्यातील नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील. 2000 युनिट मोफत वीज, बीपीएल कार्डधारकांना दहा किलो मोफत तांदूळ दिला जाईल. आरक्षणाची मर्यादा वाढवली जाईल असे आश्वासनही राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना दिले.
भारत जोडो यात्रेला देशाबरोबरच कर्नाटक राज्यातील अबालबुद्ध महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व शक्ती झोकून देऊन जनतेने भारत जोडो यात्रा यशस्वी केली. या यात्रेतून देशाला एकात्मतेचा संदेश देण्यात आला. हा देश केवळ मोदी आणि अदानींचा नसून, तो कष्टकरी आणि श्रमजीवींचा असल्याचा संदेशही भारत जोडो यात्रेने दिला. देशातील जनतेला प्रेम सद्भावना हवी आहे. मात्र भाजप तिरस्काराचे दुकान चालवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केला.
Belgaum Varta Belgaum Varta