म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार
बेळगाव : दिनांक 24 मार्च रोजी बेळगुंदी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार राजू शेट्टी शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. सरकार विविध कारणास्तव बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगुंदी येथील शेतकरी मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार आजच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
याच बैठकीत राजहंसगड शिवमूर्ती दुग्धाभिषेक सोहळा यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल सर्व दानशूर व्यक्ती आणि सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. मात्र या बैठकीत प्रामुख्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते एकत्र आहेत मात्र, नेत्यांनी बेकी करू नये, असे खरमरीत विचारही काही कार्यकर्त्यांनी बोलावून दाखवले.
मराठा मंदिर येथे आज मंगळवारी दुपारी तालुका आणि शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऍड. राजाभाऊ पाटील यांच्यासह माजी आमदार मनोहर किणेर, प्रकाश मरगाळे, मालोजी आष्टेकर, रणजित चव्हाण पाटील, एस. एल. चौगुले, ऍड. एम. जी. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. या बैठकीत दुग्धाभिषेक सोहळ्याला सहाय्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले. त्याचबरोबर रिंग रोड, बायपास, विमानतळ विस्तारीकरण, रेल्वे अशा विविध प्रकल्पांच्या नावावर शेतकरी वर्गाच्या सुपीक जमिनी संपादित केल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाने एकीच्या बळावर लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बेळगुंदी येथे 24 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी मार्गदर्शन करणार आहेत. आगामी काळातील शेतकरी आंदोलनात राजू शेट्टी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे पुढील काळात महाराष्ट्राच्या धर्तीवर बेळगावात म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले.
या बैठकीत मुंबई येथील आंदोलन आणि दुग्धाभिषेक सोहळा यशस्वी करण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्ते आणि मराठी भाषकांनी आपले निष्ठा दाखवून दिली आहे. मात्र नेत्यांनी निवडणुकीत बेकीचे राजकारण करू नये, गद्दारांना थारा दिला जाऊ नये. विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर, दक्षिण तसेच ग्रामीण आणि खानापूर या चार ममतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वांनीच प्रामाणिकपणे प्रयत्न करावे, असे मतही बहुसंख्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
भागोजी पाटील, मनोहर हलगेकर, प्रकाश अष्टेकर, रणजीत चव्हाण पाटील, सरस्वती पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. अमर येळ्ळूरकर, अनंत देसाई, आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर व अन्य मान्यवरांनी तसेच कार्यकर्त्यांनी बैठकीत आपले विचार मांडले.