
बेळगाव : सध्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसात स्मार्ट सिटीचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. नव्याने केलेला अनगोळ- वडगाव मुख्य रस्ता अवघ्या दोन महिन्यात खचल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. काल रात्रीच या रस्त्यावरून जात असताना एक दुचाकीस्वार खचलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला खाजगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आठवड्याभरापासून पावसाने जोर धरला आहे. या पावसात सर्वत्र पाणीच पाणी झालेले आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली केलेला तथाकथित विकास मात्र वाहून गेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना विकासाचे गाजर दाखविण्यासाठी करण्यात आला होता. मात्र पहिल्या पावसातच रस्ता खचल्यामुळे या रस्त्याच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
एकीकडे मुख्य रस्ता खचल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. तर दुसरीकडे याच रस्त्यावर ड्रेनेज पाईपलाईन घालण्यात आलेली आहे मात्र ती अद्याप ड्रेनेज लाईनला जोडलेली नसल्यामुळे सर्वत्र सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी ड्रेनजचे पाणी घरात शिरले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ त्यांनी घटनास्थळी भेट दिली व अनगोळ -वडगाव रस्त्याची झालेली दुरावस्था पाहून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून धारेवर धरले व या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्याची अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली. त्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर ड्रेनेजच्या साफसफाईचे काम देखील हाती घेण्यात आले आहे.
मागील सहा ते सात वर्षापासून रखडलेला अनगोळ-वडगाव मुख्य रस्ता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना राष्ट्रीय पक्षाकडे वळविण्यासाठी करण्यात आला होता. राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याने स्वतःच्या लेआउटला भविष्यात सोईस्कर होण्यासाठी अवैज्ञानिक दृष्ट्या ड्रेनेज पाईप लाईन खोलवर घालण्यात आली आहे, असेही समजते. ही पाईपलाईन घातल्यानंतर खडी मातीचा योग्य पद्धतीने भराव टाकून रस्ता दर्जेदार बनविण्याकडे दुर्लक्ष करत मतदारांना खुश करण्यासाठी निकृष्ट दर्जाचा रस्ता बनविण्यात आला होता. मात्र अवघ्या दोन महिन्यातच हा रस्ता खचून गेल्यामुळे स्मार्ट सिटीच्या कारभाराचे वाभाडे निघालेले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
समितीने नेते रमाकांत कोंडुसकर यांना सचिन पाटील या युवकाच्या अपघाताची माहिती मिळतात तात्काळ त्यांनी घटनास्थळी भेट दिली व संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून घेऊन त्यांना तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्यास सांगितले व कंत्राटदाराला धारेवर धरत सचिन पाटील या युवकासाठी येणाऱ्या संपूर्ण खर्च देण्याचे सांगितले असून त्या कंत्राटदाराने ते देखील मान्य केले आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रमाकांत कोंडुसकर यांच्या कार्यतत्परतेबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta