बेळगाव : घरपट्टी वाढीच्या मुद्यावरून महापौरांना आलेल्या कारणे दाखवा नोटीशीमुळे महापालिकेचे राजकारण चांगलेच तापले असून आमदार अभय पाटील आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यातील संघर्ष वाढला आहे. परिणामी महापालिकेच्या बरखास्तीची शिफारस सरकारकडे करू, अशा इशारा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला आहे.
घरपट्टी वाढीच्या ठरावात मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी फेरफार केला असून त्यांच्याविरोधात शिस्तभंग कारवाईचा आणि यूपीएससीकडे (केंद्रीय लोकसेवा आयोग) तक्रार करण्याचा ठराव मनपातील सत्ताधारी भाजपने केला. त्यावर पालकमंत्री जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात येत असून आयुक्तांविरोधात यूपीएससीकडे तक्रार केल्यास महापालिका बरखास्त करण्यासाठी सरकारला शिफारस करू, असा इशारा दिला. त्यामुळे मनपाची बरखास्ती अटळ मानली जात आहे.
महापालिका सभागृहात शनिवारी (दि. २१) सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर शोभा सोमनाचे होत्या. संपूर्ण सभेत घरपट्टी वाढ करण्याच्या ठरावात करण्यात आलेल्या फेरफारीच्या विषयावरून गदारोळ झाला. घरपट्टी वाढ करण्याच्या ठरावात फेरफार केला असून हा प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव करावा, अशी मागणी करत सत्ताधारी भाजप आणि विरोधी गटात जोरदार चर्चा झाली.
सत्ताधाऱ्यांनी आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याविरोधात आवाज उठवला. तर विरोधी गटाने या प्रकरणात महापौर सोमनाचे यांचाही सहभाग असल्याचा आरोप केला. त्यामुळे जोरदार वादावादी पाहायला मिळाली. तर आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी, ‘अधिकाऱ्यांनी जो ठराव आपल्याकडे दिला, तोच आपण पुढे पाठवला’, असे सांगून हात वर केले. सभा सुरू होताच आमदार अभय पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ते म्हणाले, महापालिका सभागृहात घरपट्टी वाढीबाबत जो ठराव झाला आहे, त्यात फेरफार करून चुकीचा ठराव मनपा अधिकाऱ्यांनी सरकारला पाठवला आहे. अधिकारी मनमानी करत आहेत. त्यामुळे सभागृहाच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. चूक केलेल्या अधिकाऱ्यांची बढती रोखण्यात यावी. त्याला आमदार राजू सेट यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजेत. पण, घरपट्टीबाबत अधिकाऱ्यांनी सरकारला पाठविलेल्या चुकीच्या ठरावावर महापौर शोभा सोमनाचे यांनी का सही केली, याचीही चौकशी करण्यात यावी. तर नगरसेवक शंकर पाटील यांनी चुकीच्या ठरावाबाबत आपल्याकडे पुरावे आहेत, असे सांगितले. दुपारी या सभेत पालकमंत्री सतीश जारकीहोळी दाखल झाले. त्यानंतर सभेचा नूरच पालटला. विरोधी पक्ष अधिक आक्रमक झाला. पालकमंत्री जारकीहोळी म्हणाले, घरपट्टी वाढ करण्याच्या ठरावात फेरफार झाला आहे. फेरफार केलेला ठराव नगरप्रशासन संचनालयाकडे पाठवण्यात आला आहे, याची चौकशी झालीच पाहिजे. सीओडी, सीआयडी चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत. तसा ठराव करून शिफारस करावी. हे काही रॉकेट सायन्स नाही, या विषयासाठी तीन तास बैठक घेण्याची गरज नाही, तसा ठराव करा, तत्काळ चौकशी करण्यात येईल.
.. अन् ठरावात झाला बदल
नगरसेवक संदीप जिरग्याळ यांनी चौकशीचा ठराव मांडला. घरपट्टी वाढीसंदर्भातील ठरावात फेरफार झाला आहे, या प्रकरणात आयुक्त अशोक दुडगंटी यांनी राज्यघटनेचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. त्यांची बढती रोखण्यासाठी यूपीएससीकडे तक्रार करण्यात यावी, असा ठराव मांडला. त्याला महापौर शोभा सोमनाचे यांनी तत्काळ मंजुरी दिली. पण, पालकमंत्री जारकीहोळी यांनी आक्षेप घेतला. केवळ अधिकारीच नव्हे तर फेरफार प्रकरणातील सर्वांचीच चौकशी करण्यात यावी, असा ठराव मांडावा, असे सांगितले. पण, नगरसेवक जिरग्याळ यांनी जो ठराव मांडला, तोच मंजूर करण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले.
१३८ सफाई कामगारांवर चर्चा नाही
आमदार राजू सेट यांनी १३८ सफाई कामगारांचा विषय उपस्थित करताच महापौर शोभा सोमनाचे यांनी, ही सभा संपली आहे. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे, असे सांगितले. या प्रकारामुळे विरोधी गट आक्रमक झाला. सफाई कामगारांना न्याय देण्यात आला नाही, त्यावर साधी चर्चा करण्यात येत नाही, असा आरोप आमदार सेट यांनी केला. तर सत्ताधारी पक्षाकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप इतरांनी केला. या गोंधळातच राष्ट्रगीत सुरू झाले.