बेळगाव : शाळा सुधारणा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना उद्या सोमवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० निवेदन देण्यात येणार असून शाळेतील विविध समस्या त्वरित सोडवाव्यात आणि शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी बेळगाव तालुक्यातील सर्व शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शिक्षण प्रेमी यांच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.
सरकारी शाळेमध्ये बऱ्याच समस्या आहेत. पटसंख्याप्रमाणे शिक्षकांची संख्या कमी, विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, हंगामी मुख्याध्यापकांची कायमस्वरूपी नेमणूक, स्वच्छता कर्मचारी यांची नियुक्ती करणे आदी समस्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थी खासगी शाळांकडे वळत असून सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत त्या सरकारने सरकारी शाळेत सर्व सुविधा पुरविल्यास सरकारी शाळेची पटसंख्या वाढण्यास मदत होईल आणि यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी शालेय शिक्षणमंत्री यांना निवेदन पाठविण्यात येणार आहे तरी सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहावे, असे आवाहन गंगाधर गुरव (संतीबस्तवाड), मनोहर हुंदरे (चलवेनहट्टी) यांनी केले आहे.