खानापूर (प्रतिनिधी) : रेल्वे खात्याच्या वतीने खानापूर ते गुंजीपर्यंत रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने खानापूर हेम्माडगा महामार्गावरील वाहतूक येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी की, खानापूर ते गुंजी दरम्यान रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम असल्याने रेल्वे गेटवर संपर्क रस्ता निर्मितीचे काम करण्यात येणार आहे. यावेळी मणतुर्गा जवळ असेलेल्या रेल्वे गेटवर संपर्क रस्ता निर्माण केला जाणार आहे.
हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. येत्या १५ ऑक्टोबर पर्यंत खानापूर हेम्माडगा अनमोड रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.
यावेळी हुबळी विभागाच्या उपमुख्य अभियंत्यांनी येथील खानापूर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्य काही अभियंत्याने पत्र पाठवून या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याची सुचना केली आहे.
यावेळी लोहमार्ग दुपदरीकरणाच्या कामांतर्गत रेल्वे गेटवर दोन्ही बाजूंना संपर्क रस्त्याचे प्रत्येकी दहा मीटर डांबरीकरण करण्याची रेल्वे खात्याची जबाबदारी आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गतिरोधकांची निर्मिती करावी लागणार आहे. त्यामुळे खानापूर अनमोड रस्ता बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
असोगामार्गे प्रवास
अनमोड रस्ता बंद झाल्यामुळे या भागातील मणतुर्गा, नेरसा, अशोकनगर, शिरोली, डोंगरगाव, हेम्माडगा आदी गावच्या प्रवाशांना, वाहन चालकाना असोगामार्गे प्रवास करावा लागणार आहे. अथवा गोव्याला जाणाऱ्या वाहन धारकांना रामनगर मार्गे प्रवास करावा लागणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta