रोज पाच हजार क्युसेक पाणी सोडण्याची प्राधिकरणाची सूचना
बंगळूर : कावेरी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबत कावेरी नदी जलव्यवस्थापन प्राधिकरणाने कर्नाटकला पुन्हा दणका दिला असून तामिळनाडूला पुन्हा पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.
कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने सोमवारी कर्नाटकला तामिळनाडूला दररोज ५,००० क्युसेक पाणी सोडण्याचे आदेश दिले. कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने १५ दिवसांसाठी ५ हजार क्युसेक पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीच्या सुरुवातीला तामिळनाडूने पाण्याची मागणी वाढवली होती. दररोज १२ हजार ५०० क्युसेक पाण्याची आवश्यकता होती. परंतु जलव्यवस्थापन प्राधिकरण, सीडब्ल्यूआरसीने आदेश चालू ठेवण्याची सूचना केली आहे. प्राधिकरणाचा आदेश तामिळनाडूच्या बाजूने आला आहे, या आदेशामुळे कर्नाटक सरकारची पिछेहाट झाली आहे आणि कावेरीची समस्या पुन्हा समोर आली आहे.
जलव्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. के. हलदार यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक झाली असून कावेरी जलनियंत्रण समितीचे अध्यक्ष विनीत गुप्ता या बैठकीत उपस्थित होते. २४ व्या प्राधिकरणाच्या बैठकीत तामिळनाडूचे जलसंपदा सचिव संदीप ससेना, कावेरी तांत्रिक समितीचे अध्यक्ष सुब्रमण्यम, केरळचे अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत कर्नाटक आणि पुद्दुचेरीचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. सुमारे २ तास ही बैठक चालली.
यापूर्वी १२ सप्टेंबरच्या आदेशानुसार १५ दिवसाआड पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्राधिकरणाने दिल्लीतील सीडब्ल्यूएमए कार्यालयातून हा आदेश जारी केला आहे. तामिळनाडू आणि केरळ राज्याचे अधिकारी कावेरी प्राधिकरण कार्यालयात वैयक्तिकरित्या सहभागी होते, तर कर्नाटक आणि पुद्दुचेरीचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सामील होते.