
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (6 फेब्रुवारी) आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली आहे. केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार आल्यास आरक्षणावरील 50 टक्के मर्यादा हटवली जाईल आणि देशात जातनिहाय जनगणना होईल, अशी मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “आरक्षणावर 50 टक्के मर्यादा आहे आणि आम्ही ते उखाडून टाकू.” ही काँग्रेस आणि इंडियाची हमी आहे. सध्याच्या तरतुदीनुसार 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही, पण काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडी सरकार ते उलथवून टाकेल, असे त्यांनी म्हटले आहे. दलित आणि आदिवासींच्या आरक्षणात कोणतीही कपात केली जाणार नाही, असेही राहुल यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय (ओबीसी) यांना बंधपत्रित मजूर बनवण्यात आले असून त्यांना मोठ्या कंपन्या, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि न्यायालयांमध्ये काहीही स्थान नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला. देशात जात आधारित जनगणना करणे हे आमचे पहिले पाऊल असेल. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की ते ओबीसी आहेत, पण जेव्हा जातीच्या जनगणनेची मागणी करण्यात आली तेव्हा ते म्हणाले की, येथे फक्त दोनच जाती आहेत, श्रीमंत आणि गरीब. जेव्हा ओबीसी, दलित, आदिवासींना हक्क देण्याची वेळ येते तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणतात जात नाही आणि जेव्हा मत घेण्याची वेळ येते तेव्हा ते ओबीसी असल्याचे सांगतात, अशी बोचरी टीका त्यांनी केली. दरम्यान, देशात मराठा, जात आणि गुर्जर समाजाकडून सातत्याने आरक्षणाची मागणी केली जात आहे. मात्र, तमिळनाडूचा अपवाद वगळता देशात 50 टक्क्यांची मर्यादा आरक्षण देताना कोणत्याच राज्याला ओलांडता येत नाही.
Belgaum Varta Belgaum Varta