निपाणी (वार्ता) : आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेला चांगला दर मिळत असल्याने कर्नाटकतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४०० रुपयाप्रमाणे दुसरा हप्ता देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. त्याला रयत संघटना व हसिरू क्रांती सेनेने पाठिंबा दिला आहे. यासह विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता.९) बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सीमाभागातील शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन हा मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्डयानावर यांनी केले.
स्वाभिमानी शेतकरी, रयत संघटना व हसिरू क्रांती संघटनेतर्फे येथील शासकीय विश्रामधामात सोमवारी (ता. २५) दुपारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर अरुणानंद स्वामी, अरण्य सिद्धेश्वर स्वामी, प्रा. डॉ. अच्युत माने यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
गड्यानावर म्हणाले, महाराष्ट्र सरकारप्रमाणे कर्नाटक सरकारनेही फसवणूक केलेल्या उसतोडणी मुकादमावर कारवाई करावी. वर्षभरापासून साखरेसह उपपदार्थाला चांगला दर मिळत आहे. कर्नाटक सरकारने गेल्यावर्षी इथेनॉल उत्पादन करणाऱ्या कारखान्यांनी प्रतिटन १५० रुपये व इतर कारखान्यांनी प्रतिटन १०० रुपये एफआरपीपेक्षा जादा दर द्यावा, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कारखान्यावर मोठा बोजा पडणार ही बाब लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी करावी.
ऊस वाहतूकदार संघटनेचे प्रवीणकुमार शेट्टी यांनी, महाराष्ट्रात दोन वर्षात १० हजार ३३४ मुकादमांनी ऊस वाहतूकदारांची ४८६ कोटींची फसवणूक झाली आहे. तर २७०० मुकादमावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे कर्नाटक राज्यातील ऊसतोडणी मजूर मुकादमांकडूनही मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. संबंधित मुकादमांवर गुन्हे दाखल करण्याबाबत पोलिस प्रशासनाला आदेश दिले जावेत. कारखान्यातर्फे होणारी ऊस वाहतूकदारांची वसुली थांबविण्याचे अवाहन केले.
यावेळी गणेश इळीगेर, प्रा. एन. आय खोत, सुरेश चौगुले, प्रा. डॉ. अच्युत माने यांनी मनोगतातून ९ रोजी निपाणीतून सकाळी ११ वाजता बेळगावकडे निघणाऱ्या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
बैठकीस बाबुराव पाटील, दत्तात्रय खोत, मल्लाप्पा तावदारे, महादेव गुडनावर, रावसाहेब आबदान, राजू पाटील, विद्यासागर पाटील, दादासाहेब सारापुरे, जितेंद्र पाटील, विनोद पाटील, रमेश मगदूम, अप्पू इळीगेर, बाळगौडा देसाई, प्रा. मधुकर पाटील, सुधाकर माने, केदारी चौगुले, भाऊसाहेब झिनगे, राजेंद्र गुरव, पल्लवी बेडकीहाळे, साजिदा पठाण, मंगल वागळे यांच्यासह चिक्कोडी, अथणी, रायबाग, संकेश्वर, निपाणी परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, वाहतूकदार संघटना, रयत संघटना आणि हसिरु क्रांतीचे पदाधिकारी उपस्थित होते.