निपाणी (वार्ता) : भिवशी येथील सोयाबीन व्यापारी संजय भिमगोंडा पाटील यांनी निपाणी परिसरासह महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करून रक्कम न देताच कुटुंबीयसह बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेऊन शेतकऱ्यांना त्यांची रक्कम परत मिळावी या मागणीचे तक्रार अर्ज मंडल पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांना फसगत झालेल्या बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दाखल केला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यापासून फसगत झालेले शेतकरी संजय पाटील या व्यापाराच्या शोधात आहेत. पण त्यांचा पत्ता लागला नसल्यामुळे शेवटी शेतकऱ्यांनीतक्रार अर्ज दाखल केला आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रार अर्जातील माहिती अशी, गेली पंधरा-वीस वर्षे सोयाबीन व्यापार करणारे भिवशी येथील व्यापारी संजय भीमगोंडा पाटील यांनी परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे सोयाबीन अनामात (उधार) तत्वावर खरेदी केले आहे. शेतकऱ्यांनी रकमेची मागणी करीत असताना संजय पाटील हे भिवशी येथील निवासस्थानाला टाळे ठोकून कुटुंबीयांसह बाहेरगावी पसार झाले आहेत.
मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी, पीडित शेतकऱ्यांचा अर्ज स्वीकारून सदर व्यापाऱ्याची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी परवानाधारक व्यापाऱ्यांच्या बरोबर व्यवहार करण्याचा सल्ला दिला.
निपाणी तहसीलदार कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारला. त्यांनीही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
तक्रार अर्जावर सदाशिव पोवार, महादेव मगदूम, धोंडीराम वनीरे, सूर्यकांत पोवार, नितीन मगदूम, आप्पासो शेळके, जीवन चौगुले, दिलीप पाटील, नितीन पाटील, शिवगोंडा चव्हाण, विनायक चौगुले, निवास चौगुले, दत्तात्रय पाटील, श्रीकांत पाटील, बाबासाहेब पाटील, विजय पाटील, अनिल पाटील, रवींद्र पाटील, काशिनाथ मगदूम, काकासो मेंच, सूर्यकांत पाटील, मदन माने, संजय चौगुले, संभाजी कडाकणे, पार्थ मेहता, साताप्पा कुंभार, इरगोंडा पाटील, गिरीश पोवार, सुरेश पोवार, पांडुरंग देसाई यांच्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सुमारे ८० शेतकऱ्यांची नावे आहेत.