Sunday , December 14 2025
Breaking News

माजी आमदार कै. काकासाहेब पाटील हे सामान्य जनतेचे नेते : मंत्री सतीश जारकीहोळी

Spread the love

 

सर्वपक्षीय शोकसभा

निपाणी : एका सामान्य कुटुंबात जन्मलेले काकासाहेब पाटील यांनी निपाणी मतदारसंघाचे तीन वेळा आमदार म्हणून काम केले आहे. सामान्य कुटुंबांच्या वेदना काय असतात त्यांना चांगल्या माहीत होत्या. त्यांनी आयुष्यभर संघर्ष करून लोकांना न्याय मिळवून दिला. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कायमस्वरूपी कामे केली असली तरी त्यांची काही कामे अपूर्ण राहिली आहेत. ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे आश्वासन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले.

कै. काकासाहेब पाटील यांच्या निपाणी मतदारसंघातील कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी शुक्रवारी (२०) येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात सर्वपक्षीय शोकसभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री जारकीहोळी म्हणाले की, काकासाहेब पाटील यांनी निपाणी मतदारसंघ अबाधित ठेवणे आणि काळम्मावाडी पाणी करारासह अनेक शाश्वत विकास कामे केली आहेत. त्यांच्या कामामुळे नागरिकांनी त्यांना जिल्हा पंचायत सदस्यांपासून आमदारांपर्यंत पदे दिली. त्यांनी धारवाड-निपाणी-कराड रेल्वे मार्गासाठी कठोर परिश्रम केले. पण त्यांचे हे महत्त्वाचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. ते साकार करण्यासाठी आम्ही सर्व नेत्यांच्या सहकार्याने प्रयत्न करू. विविध क्षेत्रात सामान्य लोकांच्या समस्या सोडवल्यामुळेच सामान्य लोकांमध्ये त्यांचे स्थान होते. कोणत्याही कामात घाई न करता त्यांनी चपळता आणि हुशारीने मतदारसंघाचा विकास केला. येणाऱ्या काळात काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या अपूर्ण स्वप्नांच्या पूर्ततेसाठी काम करत राहावे.

विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की, माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी साधा राजकारणी कसा असावा हे दाखवून दिले आहे. तीन वेळा विधानसभेवर निवडून येऊनही त्यांनी एका सामान्य कार्यकर्त्यासारखे काम केले. त्यांनी काँग्रेस पक्षाला बळकट केले आहे. कार्यकर्त्यांनी त्यांची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी अथक परिश्रम करावेत.

शोकसभे वेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, माजी आमदार प्रा.सुभाष जोशी, अण्णासाहेब हावळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, प्रा.शिवाजी मोरे, पंकजा पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, राजेंद्र वड्डर, नगरसेवक विलास गाडीवड्डर, राजेंद्र ना. गाडीवड्डर, राजू चव्हाण, प्रा.बाळासाहेब सूर्यवंशी, किसन दवणे, सी.ए.खराडे, प्रा.सुरेश कांबळे, संभाजी तोरवट, सुमित्रा उगले, कबीरा वराळे, रियाजा भगवान आदींनी काकासाहेब पाटील यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला.

संकेश्वरच्या माजी नगराध्यक्षा श्रीकांत हातनूर, चंद्रकांत जासूद, शंकरदादा पाटील, सुंदर पाटील, गोपाळ नाईक, बाबुराव खोत, नगरसेवक संजय सांगावकर, आ.संजय चव्हाण, गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक, नगरसेविका शांता सावंत, वर्षा चव्हाण, अनिता पठाडे, अशोककुमार पाटील, विविध पक्षांचे कार्यकर्ते, राजकुमार पाटील, दिवंगत कार्यकर्ते उपस्थित होते. शोकसभेला निपाणी मतदारसंघातील नागरिक, महिला उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ‘रयत’ ची विधानसभेला धडक निपाणीत चाबूक मोर्चा; तहसीलदारांना निवेदन

Spread the love  निपाणी (वार्ता) : ऊस पिकापासून सरकारला जाणाऱ्या करातून प्रति टन उसाला किमान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *