सीमाभागात २५ वर्षांपासून वृक्षसंवर्धनासह पर्यावरण; जनजागृतीचे कार्य
निपाणी (वार्ता) : निपाणीचे रहिवासी आणि कागल तालुक्यातील चिळली (ता. कागल) येथील कुमार विद्यामंदिरचे विषय शिक्षक व पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते नामदेव विठोबा चौगुले यांच्या सीमाभागात केलेल्या पर्यावरणीय कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली असून बेंगलुरू येथील अखिल कर्नाटक सांस्कृतिक परिषद (आर) या संस्थेकडून त्यांची पर्यावरणप्रेमी शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
जगदुरु संत व ज्ञानयोगी सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने बेळगाव येथील कुमार गंधर्वसभा भवन येथे होणाऱ्या दुसऱ्या अखिल भारतीय कविपीठ महासंमेलनात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
नामदेव चौगुले हे कागल तालुक्यातील चिखली येथीलकुमार विद्यामंदिर शाळेत विषय शिक्षक म्हणून कार्यरत असून शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीतही ते सातत्याने सक्रिय आहेत. गेली सुमारे २५ वर्षे त्यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागात पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पर्यावरण जनजागृती, -जैवविविधतेचे संरक्षण आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
चौगुले हे अभिनेते सयाजी शिंदे निर्मित सह्याद्री देवराई या पर्यावरण चळवळीशी स्वयंसेवक म्हणून जोडलेले असून त्यांनी अनेक ठिकाणी वृक्षसंवर्धनव निसर्गरक्षणाचे उपक्रम राबवले आहेत. तसेच त्यांनी स्थापन केलेल्या भूमी वात्सल्य सोशल फाऊडेशन या संस्थेच्या माध्यमातून गावोगावी वृक्षलागवड, पर्यावरण शिक्षण आणि निसर्गसंवर्धन आणि जनजागृतीचे काम करत आहेत. त्यांच्या या उपक्र मांमुळे सीमाभागातील अनेक गावांमध्ये हरित चळवळीला चालना मिळत आहे.
या पुरस्कारामुळे चिखली परिसरासह कागल तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक व पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नामदेव चौगुले यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta