
निपाणी ग्रामीण भागातील चित्र; कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर
निपाणी (वार्ता) : प्रत्येक गावातील कचरा उचलण्यासाठी बहुतांश ग्रामपंचायत मध्ये शासनाने घंटागाड्या उपलब्ध केले आहेत. पण ग्रामस्थ त्यामध्ये कचरा न टाकता गावच्या वेशीवर कचरा टाकत असल्याने अनेक गावात रस्त्याच्या कडेलाच कचऱ्याचे ढीग साठले आहेत. त्यामध्ये प्लास्टिक, जुने कपडे, रद्दी आणि इतर सुक्या कचऱ्याचा समावेश आहे. दिवसेंदिवस ही समस्या अधिकच गंभीर बनत चालली असून गावच्या वेशीवर वर कचऱ्याने स्वागत होत असल्याचे चित्र निपाणी भागात दिसत आहे.
घराघरांतून बाहेर काढलेला कचरा थेट गावाच्या बाहेर फेकून दिला जात असल्याने दुर्गंधी, रोगराई आणि पर्यावरणाचा न्हास, असे अनेक धोके निर्माण झाले आहेत. जुने, निरुपयोगी साहित्य बाहेर काढले जातो. याशिवाय हॉटेल धाब्यामधील शिळे अन्न, प्लास्टिकच्या वस्तू कागद आणि इतरकचरा घंटागाडीला देण्याऐवजी ग्रामस्थ तो गावाच्या वेशीवर, रस्त्यांच्या कडेला फेकून देत आहेत. निपाणी शहरापासून यमगरणी, सौंदलगा, बेनाडी, कुन्नूर, अक्कोळ, गळतगा गावाशेजारील वेशीवर अशा कचऱ्याची समस्या डोकेदुखी बनली आहे.
ओला कचरा काही प्रमाणात गावातच जिरत, पण प्लास्टिक, थर्माकोल, जुने कपडे, चपला, रद्दी, काचेच्या बाटल्या, तुटलेले डबे यांसारख्या सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण ठरत आहे.
त्यामुळे गावच्या वेशीवर कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. ही ठिकाणे रोगराईचे केंद्र बनली आहेत. कचऱ्यात काहीतरी खाण्यासाठी मिळेल या आशेने कुत्री आणि मोकाट जनावरे तो कचरा रस्त्यावर ओढून आणत आहेत.त्यामुळे विविध प्रकारचे आजार, संसर्गजन्य रोगांचा फैलाव होण्याची भीती आहे. शिवाय, प्लास्टिक आणि इतर न विरघळणाऱ्या कचऱ्यामुळे पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे.
——————————————————————–
शासन योजनांची उदासीनता
वेशीवरील कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायतीने गावागावात घंटागाड्या उपलब्ध केल्या आहेत. पण ग्रामस्थ घंटागाडीला कचरा देण्यास तयार नाहीत. कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक साधने आणि मनुष्यबळ त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत. शासनाच्या स्वच्छ भारत अभियानानंतर काही प्रमाणात हालचाल झाली होती, पण सध्या त्या उपाययोजना पूर्णपणे थंडावल्या आहेत. त्यामुळे हा कचरा गावच्या वेशीवर पडत आहे
——————————————————————–
‘घराघरातील कचरा संकलन करण्यासाठी अनेक ग्रामपंचायतीने घंटागाड्या सुरू केले आहेत. या गाड्यांना कचरा देण्यासाठी जनजागृती करूनही ग्रामस्थ त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. तरी नागरिकांनी गावच्या वेऊवर कचरा न टाकता घंटागाड्यांना देऊन सहकार्य करावे.’
– शिवानंद होसमणी, पिडिओ, ग्रामपंचायत, बेनाडी
Belgaum Varta Belgaum Varta