नवी दिल्ली : राष्ट्रकुल 2022 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सिंगपटू लवलीना बोरगोहेनने गंभीर आरोप केला आहे. राजकारणामुळे तयारीवर वाईट परिणाम झाला असून मानसिक छळ सहन करावा लागल्याचा गंभीर आरोप लवलीना हिने केला आहे. सोमवारी 25 जुलैला सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिने आपली व्यथा जगासमोर मांडली आहे.
लवलीना हिच्या कोच संध्या गुरुंग यांना काही दिवसांपूर्वी अचानक काही माहिती न देताच हटवण्यात आले होते. पण अखेरीस त्यांचा पुन्हा समावेश करण्यात आला. असे असले तेरी लवलीनला क्रीडा ग्राममध्ये प्रवेश मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. ज्याचा थेट परिणाम सरावावर होत आहे, असे लवलीना हिने म्हटले आहे.
लवलीनाने टि्वटरवरून गंभीर आरोप केले आहेत. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते की, ऑलिम्पिक मध्ये मदत करणाऱ्या प्रशिक्षकांना हटवून तयारीमध्ये अडथळा आणला जात आहे. यामुळे माझ्या ट्रेनिंग प्रोसेसवर परिणाम होतो आहे. ज्यामुळे मला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मी मोठ्या दु:खी अंत:करणाने हे सर्व तुमच्यासमोर मांडत आहे,’ अशी भावना लवलीनाने व्यक्त केली आहे.
कोच बदलल्याने ट्रेनिंगवर परिणाम
लवलीनाने मागच्यावर्षी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ब्रांझ पदक पटकावले होते. त्यावेळी तिच्यासोबत प्रशिक्षक संध्या गुरुंग ऑलिम्पिकदरम्यान होत्या. कोच गुरुजी यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पण या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षकांना अचानक बाहेर करण्यात आले. ज्यामुळे लवलीनाच्या सरावावर विपरीत परिणाम झाला. तिला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. ही सर्व व्यथा तिने ट्विट करून मांडली आहे. तिच्या आरोपानंतर भारतीय क्रीडा जगत पुन्हा चर्चेत आले आहे.