बेळगाव : भारतीय जनता पक्ष कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे कार्यदर्शी किरण जाधव यांनी नुकतीच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. “आत्मनिर्भर भारत, मेक ईन इंडिया, मेड ईन इंडिया” अंतर्गत बेळगावमध्ये संरक्षण विभागाशी निगडित वाहन निर्मिती उद्योग सुरू केला जावा या संदर्भात या भेटीदरम्यान चर्चा झाली.
जमिनीत पेरणी केलेले भूसुरंग तपासणीसाठी लागणाऱ्या तसेच संरक्षण खात्याशी निगडित इतर महत्त्वाच्या कामासाठी लागणाऱ्या बुलेटप्रूफ आणि हल्ल्यासाठी सुसज्ज अशा वाहन निर्मितीचा कारखाना बेळगावमध्ये सुरू केला जावा, अशी विनंती वजा मागणी किरण जाधव यांनी राजनाथ सिंग यांच्याकडे केली. यावेळी राजनाथ सिंग यांनी सकारात्मक होकार देताना याविषयी गांभीर्याने विचार केला जाईल अशी ग्वाही दिली.
बेळगावमध्ये संरक्षण दलाशी निगडित या वाहन निर्मितीचा कारखाना सुरू झाल्यास या भागातील सुमारे अडीच ते तीन हजार बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम भारत निर्मितीचे स्वप्नही पूर्ण होण्यास हातभार लागेल, असे किरण जाधव यांनी या उद्योग उपक्रमाविषयी बेळगावमधील प्रसार माध्यमाशी बोलताना म्हटले आहे.
उद्यमबाग परिसरातील काही कारखानदारांनीही या वाहन निर्मिती उद्योग उभारणीत सक्रिय सहभागी होण्याची तयारी दर्शविली असल्याचेही किरण जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.