Wednesday , December 10 2025
Breaking News

स्वार्थी राजकारण्यांना हिसका दाखवण्यासाठी उद्यापासून पाच दिवस शिवसन्मान पदयात्रा; रमाकांत कोंडुसकर यांची माहिती

Spread the love

 

 

बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार विविध प्रकारे अत्याचार करीत आहे. सीमाभातील मराठी माणसाचे भवितव्य अंधाराले आहे. मराठी भाषिक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. मराठी भाषिक कार्यकर्त्यांवर दबाव तंत्र अवलंबले जात आहे.विकासाच्या नावावर लोकप्रतिनिधींचा भ्रष्टाचार सुरू आहे. बेळगावच्या मराठा लष्कर प्रशिक्षण केंद्रांच्या जवानांचे घोषवाक्य छत्रपती शिवाजी महाराज की जय आहे. समस्त हिंदुत्ववादी आणि देशवासी यांचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांना वगळून रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यात आला आहे. बेळगावच्या रेल्वे स्थानकावर अन्य थोर राष्ट्रपुरुषांबरोबरच छत्रपती शिवरायांचे भव्य मूर्ती साकारण्यात यावी. या मागणीसाठी, मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आणि स्वार्थी राजकारणांना इसका दाखवण्यासाठी, उद्या बुधवारपासून सलग पाच दिवस शिवसन्मान पदयात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि श्रीराम सेनेचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी शिवसन्मान पदयात्रे संदर्भात अधिक माहिती देताना कोंडुसकर म्हणाले, बेळगाव सीमा भाग आणि कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा आणि भगव्याचा ध्वजाचा सातत्याने अवमान केला जात आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरीही, बेळगाव सीमा भागातील मराठी भाषकांची परिस्थिती पारतंत्र्यात अडकल्यासारखी आहे. सीमा भागातील मराठी माणसांचा आत्मसन्मान चिरडण्याची एक संधी ही कर्नाटक प्रशासन सोडत नाही. बहुसंख्य मराठी भाषिक शेतकऱ्यांचे प्रश्न जटिल होत चालले आहेत. सरकारच्या आडमुठेपणामुळे तरुणवर्गात निराशा आहे. निराश बनलेले तरुण व्यसनाधीन होत आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. त्यांना तुरुंगात डांबण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी विविध प्रकारे संपादित करण्याचे कटकारस्थान सातत्याने सुरू आहे. याला विरोध करण्यासाठी शिवसन्मान पदयात्रा आयोजित केली आहे.
बेळगावच्या ऐतिहासिक राजहंसगडाला राजकारण्यांनी वादाचा मुद्दा बनविला आहे. त्यास राजहंसगडावरून उद्या बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता येथून पदयात्रेला सुरुवात होणार आहे. राजहंसगडावरील मंदिरात पूजा करून पदयात्रेला सुरुवात होईल. राजहंसगड येथून सुरू झालेली पदयात्रा यरमाळ गाव, अवचारहट्टी, देवगनहट्टी, धामणे व सायंकाळी येळ्ळूर येथे पदयात्राची वस्ती असेल.
दुसऱ्या दिवशी 23 फेब्रुवारीला सकाळी येळ्ळूर गावातून पदयात्रा पुढे निघेल. सुळगा, देसूर, झाड शहापूर, मच्छे, हूंचनहट्टी, बाळगमट्टी, कुट्टलवाडी मार्गे सायंकाळी पिरवाडी येथे पदयात्रेची वस्ती होईल.
पदयात्रेच्या तिसऱ्या दिवशी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी पिरनवाडी येथून पदयात्रा प्रस्थान करेल. ब्रह्मनगर, खादरवाडी, राजाराम नगर, मजगाव, रोहिदास नगर, चन्नमा नगर, पार्वती नगर येथून भवानी नगर येथे सायंकाळी पदयात्रेची वस्ती होईल.
पदयात्रेच्या चौथ्या दिवशी 25 फेब्रुवारीला भवानीनगर येथून पदयात्रा प्रस्थान करेल. टिळकवाडी पापा मळा, शिवाजी कॉलनी, नानावाडी, टिळकवाडी परिसर, अनगोळ, भाग्यनगर मार्गे वडगाव येथे पदयात्रेची वस्ती होईल.
पदयात्रेच्या शेवटच्या दिवशी 26 फेब्रुवारीला वडगाव येथून पदयात्रा प्रस्थान करेल. जुने बेळगाव, सोनार गल्ली, नाथ पै चौक, शिवाजी गार्डन, महात्मा फुले रोड, गोवा वेस मार्गे बेळगाव रेल्वे स्टेशनवर पदयात्रेची सांगता होईल. पदयात्रेदरम्यान दररोज प्रवचने आणि समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांमध्ये होणार आहेत, असेही कोंडुसकर यांनी सांगितले.
सदर पदयात्रा भाषिकांच्या सन्मानासाठी, विकासाच्या नावावर सुरू असलेले भ्रष्टाचाराचे षडयंत्र उधळून लावण्यासाठी, स्वार्थी राजकारण्यांना हिसका दाखवण्यासाठी. त्याचबरोबर 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मुंबई आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भातही पदयात्रेत जनजागृती केली जाणार आहे. या पदयात्रेत प्रत्येक गावातील आणि भागातील त्याचबरोबर सीमा भागातील समस्त हिंदुत्ववादी आणि मराठी भाषिकांनी मिळेल त्या वेळ मिळेल त्याप्रमाणे सहभागी व्हावे, असे आवाहनही कोंडूसकर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

चर्चच्या बांधकामावरून निर्माण झालेला वादासंदर्भात बेळगाव बिशप यांनी घेतली मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची भेट

Spread the love  बेळगाव : गदग जिल्ह्यातील गजेन्द्रगड येथील होली फॅमिली स्कूल परिसरात पाद्री निवासस्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *