खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची बैठक सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी तीन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव बळवंतराव देसाई होते.
१ नोव्हेंबर २०२३ रोजी काळादिन गांभीर्याने पाळण्यात यावा यासाठी बहुसंख्येने कार्यकर्त्यांनी हजर रहावे यासाठी गर्लगुंजी विभाग, जांबोटी विभाग, लोंढा विभाग, नंदगड विभाग, खानापूर शहर असा जागृती दौरा करावा, असे ठरविण्यात आले.
या बैठकीचे प्रास्ताविक सरचिटणीस श्री. आबासाहेब नारायणराव दळवी यांनी केले. यावेळी कार्याध्यक्ष श्री. निरंजन सरदेसाई, श्री. मुरलीधर पाटील, खजिनदार श्री. संजीव रामचंद्र पाटील, उपखजिनदार श्री. पांडुरंग तुकाराम सावंत, जांबोटी विभाग उपाध्यक्ष श्री. जयराम देसाई, गर्लगुंजी विभाग उपाध्यक्ष श्री. कृष्णा कुंभार, नंदगड विभाग अध्यक्ष श्री. रमेश धबाले, श्री. डी. एम. भोसले गुरूजी, मध्यवर्ती म. ए. समितीचे सदस्य अजित पाटील, रमेश देसाई, जगन्नाथ देसाई, सीमासत्याग्रही श्री. फकीरा जैनू सावंत व श्री. नारायण रामचंद्र लाड, जयसिंगराव पाटील, अमृत शेलार, जयवंत पाटील, बळीराम देसाई, शिवाजी पाटील, वसंत नावलकर, बी एन पाटील, म्हात्रू धबाले, नागेश भोसले, संतोष पाटील इत्यादी सभासद बहुसंख्येने हजर होते.
या संदर्भात निरंजन सरदेसाई, मुरलीधर पाटील, बाळासाहेब शेलार, गोपाळराव पाटील, जयवंत पाटील, राजाराम देसाई, रविंद्र शिंदे यांनी आपले विचार मांडले. यावेळी अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, १ नोव्हेंबर काळादिन केंद्र शासनाच्या निषेधार्थ १९५६ पासून आजतागायत आम्ही सीमावासीय गांभीर्याने पाळत आलो आहोत. याचप्रमाणे १ नोव्हेंबर २०२३ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथील माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृहात लाक्षणिक उपोषण सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत करून धरणे आंदोलन करायचे आहे. यासाठी खानापूर पोलिस ठाण्यात रितसर परवानगीसाठी अर्ज करण्याचे ठरविण्यात आले आहे. परवानगी मिळो अथवा न मिळो हे उपोषण करण्यात येणार असल्याचे ठणकावून सांगितले. बैठकीचे आभार श्री. शंकर गावडा यांनी मानले.