नवी दिल्ली : भाजपविरोधात लढण्यासाठी विरोधकांनी आधी एकत्र येण्याची गरज आहे. या आघाडीचा नेते 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतरही ठरवता येईल, अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले.
भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नितीशकुमार प्रथमच दिल्ली दौर्यावर आले असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची मोट बांधण्याच्या दृष्टीने ते बिगर भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माकपचे सरचिटणीस दिपांकर भट्टाचार्य यांची नितीश यांनी भेट घेतली. पवार यांच्यासोबत त्यांनी याच मुद्यावर सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांनी आधी एकत्र येऊन भाजपविरोधात पर्याय देण्याची गरज असल्याचे सांगितले.
बिगर भाजप पक्षांना एकत्र आणण्याचे पवार आणि माझे प्रयत्न आहेत. आघाडीचा नेता कोण, हे नंतर ठरवता येईल असे ते म्हणाले. त्यांनी सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी तर मंगळवारी माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकपचे सरचिटणीस डी. राजा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय लोकदलाचे नेते ओमप्रकाश चौटाला, सपा नेते अखिलेश यादव यांच्या भेटी घेतल्या. सोनिया गांधी परदेशात असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी पुन्हा दिल्लीला जातील.