हैदराबाद : आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं निघाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह इतर संताच्या पालख्यांसोबत मोठ्या संख्येनं वारकरी आहेत. अशातच या आषाढी वारीच्या महासोहळ्यात सहभागी होण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पंढरपुरात येणार आहेत. त्यांच्यासोबत तेंलगणा सरकारचे संपूर्ण मंत्रीमंडळ देखील हजेरी लावणार आहे. तसेच हेलिकॉप्टरमधून वाकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. 300 गाड्यांच्या ताफ्यातून हे मंत्रीमंडळ महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
बीआरएस पक्ष महाराष्ट्रात जोरदार एंट्रीच्या तयारीत
अब की बार किसन सरकार असे म्हणत बीआरएस पक्ष महाराष्ट्रात जोरदार एंट्रीच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी थेट वैष्णवांचा महामेळा असणाऱ्या आषाढी यात्रेचा मुहूर्त निवडला आहे. आषाढी वारीसाठी गेले अनेक वर्षापासून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिगविजय सिंग येत असतात. पण आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आता संपूर्ण मंत्रीमंडळासह विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत. आषाढीच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री दर्शनाला येतील. सोबत तेलंगणाचं सर्व मंत्रिमंडळ त्या दिवशी पंढरपुरात असेल. परवानगी मिळाली तर वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करणार आहेत.
के चंद्रशेखर राव यांच्या स्वागताची भगीरथ भालकेंकडून जोरदार तयारी
के चंद्रशेखर राव हे 27 जूनला पंढरपूरला येतील. विठ्ठल दर्शनासोबत ते वारकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत. खरे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दशमी दिवशी म्हणजे 28 जून रोजी पंढरपूरमध्ये येत असताना त्याच्या एक दिवस आधी चंद्रशेखर राव पंढरपुरात पोहोचणार आहेत. आषाढीपूर्वीच पुण्यापासून सर्व पालखी मार्गावर आणि पंढरपूर शहरात बीआरएसकडून जोरदार होर्डिंगबाजी करण्यात आली आहे. यातच आता खुद्द या पक्षाचे अध्यक्ष पंढरपूरला येणार असल्याने या आषाढी यात्रेत राजकीय वातावरण देखील तापणार आहे. काही दिवसापूर्वी पंढरपूरचे भगीरथ भालके यांनी चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन बीआरएस पक्षात प्रवेश संदर्भात चर्चा केली होती. आता आषाढीला चंद्रशेखर राव येत असताना त्यांच्या स्वागतासाठी भगीरथ भालके आणि त्यांची भलीमोठी टीम सज्ज असणार आहे. आता आषाढीला येणाऱ्या या राजकीय नेत्यांपैकी पंढरीचा पांडुरंग कोणाला पावणार? हे येणार काळच ठरवेल.
Belgaum Varta Belgaum Varta