

बेळगाव : खादरवाडी गावातील ‘बक्कापाची वारी’ या जमिनीचा विषय 180 एकर जमिनीच्या मालकी हक्काशी संबंधित होता, ज्यावर साडेतीन वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षानंतर गावकऱ्यांनी विजय मिळवला आहे.
180 एकर जमीन बेकायदेशीररित्या विकण्याचे आणि त्यावर अतिक्रमण करण्याचे प्रयत्न सुरु होते. सातबारा उताऱ्यातून वगळण्यात आलेला “खादरवाडी गावचे शेतकरी सामायिक वहिवाटदार” हा उल्लेख पुन्हा जोडण्यात यश आले आहे, ज्यामुळे ही जमीन गावचीच असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
गावातील शेतकरी आणि युवाशक्तीच्या एकजुटीमुळे या जमिनीवरील बेकायदेशीर व्यवहार थांबले असून, 4 मे 2026 रोजी ग्रामस्थांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. या संदर्भात शेतकरी अनेक दिवसांपासून लढा देत होते आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनेही दिली होती.
या निर्णयामुळे बेकायदेशीररीत्या सुरु असलेले खरेदी-विक्री व्यवहार आणि अतिक्रमणाचे प्रयत्न थांबले असून, गावची भूमी वाचवण्यात यश आले आहे. काही जणांकडून जमिनीचे व्यवहार सुरु होते. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला.
राजेश पाटील आणि राकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आकाश पाटील, रोहन देसाई, अरुण माळवी, लक्ष्मण पाटील, विशाल पाटील, लखन पिंगट, गुंडू देसाई यांच्यासह अनेक युवकांनी सातत्याने पाठपुरावा केला. आरटीआयच्या माध्यमातून माहिती गोळा करुन प्रशासनासमोर मांडली.
जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदारांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले. तपासात सातबारा उताऱ्यातील वहिवाटीचा उल्लेख बेकायदेशीररीत्या वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तो उल्लेख पुन्हा समाविष्ट करण्यात आला आणि त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले.
या निर्णयामुळे आता या जमिनीवर कोणताही व्यवहार गावकरी व शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय करता येणार नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या लढ्याला शेतकरी संघटना, स्थानिक कार्यकर्ते, तसेच जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, रमाकांत दादा कोंडुस्कर आणि इतर मान्यवरांचे सहकार्य लाभल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta