

बेळगाव : कर्नाटक महर्षी वाल्मीकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातील निधीच्या कथित गैरव्यवहार आणि मनी लाँडरिंग प्रकरणावरून भाजप महिला मोर्चाच्या कर्नाटक सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी सरकारवर टीका केली आहे. “एसटी समाजाच्या हक्काच्या पैशांचा एक-एक रुपयाचा हिशोब जनतेला द्यावाच लागेल,” अशी मागणी त्यांनी केली.
महामंडळाच्या निधीतील सुमारे 89.62 कोटी रुपयांचा निधी कथितरीत्या बेकायदेशीर पद्धतीने वळवून विविध खात्यांमधून व्यवहार करण्यात आल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे. या प्रकरणी माजी मंत्री बी. नागेंद्र यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) कारवाई केली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) तपासातही सुमारे 89.63 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारासंदर्भात गंभीर बाबी समोर आल्याचे सांगण्यात आले असून, नागेंद्र यांच्यासह अनेक आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
ईडीने नागेंद्र यांच्याशी संबंधित सुमारे 8.07 कोटी रुपये मूल्याच्या स्थावर मालमत्तांवर PMLA अंतर्गत तात्पुरती जप्तीची कारवाई केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
“हा निधी अनुसूचित जमातींच्या विकासासाठी राखीव असलेला जनतेचा पैसा आहे. एसटी समाजातील गरीब व वंचित कुटुंबांच्या शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी हा निधी वापरला जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे निधीचा कथित गैरवापर झाला असल्यास ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असे सरनोबत यांनी म्हटले.
कथित गैरव्यवहारातील संपूर्ण रक्कम शोधून काढावी, दोषी कोणताही असो त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी आणि संपूर्ण तपास पारदर्शक पद्धतीने करावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, बी. नागेंद्र यांनी त्यांच्यावरील आरोप नाकारले आहेत. त्यामुळे अंतिम दोष निश्चित करण्याचे काम न्यायालयीन प्रक्रियेतच होणार आहे. मात्र, तपास यंत्रणांनी उपस्थित केलेल्या गंभीर आरोपांबाबत नागेंद्र यांनी जनतेसमोर स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी सरनोबत यांनी केली.
“एसटी समाजाच्या हक्काच्या पैशांचे संरक्षण करणे ही सरकार आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. भ्रष्टाचार व आर्थिक गैरव्यवहाराविरोधातील भाजपचा संघर्ष सुरूच राहील,” असे डॉ. सोनाली सरनोबत यांनी स्पष्ट केले.

Belgaum Varta Belgaum Varta