
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने ‘कळा या लागल्या जीवा’ हा कवी चंद्रशेखर गायकवाड यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम तसेच उपस्थितांचे खुल्या काव्यसंमेलनाचे आयोजन शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता सरस्वती वाचनालयाच्या माई ठाकूर सभागृहात करण्यात आले आहे.
चंद्रशेखर गायकवाड हे गेली अनेक वर्षे सातत्याने मराठी साहित्य क्षेत्रात कार्यरत असून मराठी कविता, कथा लेखनसह हिंदी आणि इंग्रजी भाषेतही लेखन केले आहे. त्यांचा ‘कळा या लागल्या जीवा’ हा कविता संग्रह प्रकाशित असून खानापूर येथील निसर्ग साहित्य संमेलनाचा कै प्रा. वसंत कुलकर्णी काव्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच विविध नियतकालिकात त्यांच्या साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या आहेत. बेळगावच्या साहित्य-सांस्कृतिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. गोवा येथील काव्यहोत्र या विश्वविक्रमी कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर पुणे, परभरणी, रायगड, सातारा येथील कवी संमेलनात त्यांनी काव्य वाचन केले आहे.
या कार्यक्रमात एका संवेदनशील कवीचा साहित्यिक प्रवास उलगडणार असून त्यांच्या भावस्पर्शी कवितांचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. यावेळी प्रारंभी स्थानिक कवींसाठी खुले काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या साहित्यिक कार्यक्रमास सर्व साहित्यप्रेमी, कवी, रसिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगावचे सचिव श्री. सुधाकर गावडे यांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta