
बेळगाव : एका पिआयडी क्रमांकावर केवळ एकच नळ जोडणी देण्याची जाचक अट तातडीने रद्द करण्यात यावी, अशी मागणी करत बेळगाव शहर व परिसरातील नागरिकांनी बेळगाव महानगरपालिकेकडे निवेदन सादर केले. या निवेदनातून शहरातील विविध पाणी समस्यांकडेही मनपाचे लक्ष वेधण्यात आले.
एकाच घरात किंवा एकाच पिआयडी क्रमांकांतर्गत अनेक कुटुंबे स्वतंत्रपणे राहत असतील, तर प्रत्येक कुटुंबाच्या गरजेनुसार स्वतंत्र नळ जोडणी देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्याची एक जोडणीची अट अनेक कुटुंबांसाठी गैरसोयीची ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
तसेच, जुन्या पद्धतीनुसार एकाच पिआयडी क्रमांकावर यापूर्वीपासून दोन ते तीन स्वतंत्र नळ जोडण्या असलेल्या नागरिकांच्या जोडण्या खंडित करू नयेत. या जोडण्या कोणत्याही अडथळ्याविना नियमित सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
बेळगाव महानगरपालिका ही नागरिकांच्या सोयीसाठी कार्यरत असल्याने या समस्येची तातडीने दखल घेऊन संबंधित L&T कंपनीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश द्यावेत आणि सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन सादर करताना रमाकांत दादा कोंडुसकर, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, राजू बिरजे, विकास कलघटगी, प्राचार्य आनंद आपटेकर, सुनील बोकडे, प्रसाद मरगाळे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. मनपाकडून या मागण्यांवर लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

Belgaum Varta Belgaum Varta