
बेळगाव : आजच्या काळात, रक्षाबंधनाची व्याप्ती केवळ भाऊ-बहिणींच्या नात्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. हा सण समाजात शांती, प्रेम, सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश देणारा आहे असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी मिनाक्षी दीदी यांनी केले.
सरस्वती रोड येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या शहापूर केंद्रात आज शुक्रवारी सकाळी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शहापूर केंद्राच्या प्रमुख मीनाक्षी दीदी यांच्यासह ब्रह्माकुमारी अन्नपूर्णा दीदी, ब्रह्मकुमारी राधिका दीदी, ब्रह्माकुमार काशिनाथ व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी रक्षाबंधनाचे महत्त्व पटवून देताना मीनाक्षी दीदी म्हणाल्या, रक्षाबंधन सणाशी अनेक पौराणिक कथा आणि ऐतिहासिक घटना निगडित आहेत. महाभारताच्या काळात, जेव्हा भगवान कृष्णाच्या बोटातून रक्त येऊ लागले, तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून त्यांच्या मनगटावर बांधला. या धाग्याच्या बदल्यात, भगवान कृष्णाने द्रौपदीचे सर्व संकटांपासून रक्षण करण्याचे वचन दिले आणि तिच्या वस्त्रत्यागाच्या वेळी तिचे रक्षण केले होते.
आजच्या काळात, रक्षाबंधनाची व्याप्ती आता केवळ भाऊ-बहिणींपुरती मर्यादित राहिलेली नाही. हा सण समाजात प्रेम, सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश देतो. महिला देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत राख्या पाठवतात.थोडक्यात, रक्षाबंधनाचा धागा नाजूक असला तरी, त्याच्याशी निगडित विश्वास आणि प्रेम अत्यंत घट्ट असते. हा सण भारतीय संस्कृतीचा मोठेपणा, नात्यांची प्रतिष्ठा आणि प्रेमाची निस्वार्थ भावना जिवंत ठेवतो असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थितांना ध्यान धारणेचे महत्त्वही पटवून देण्यात आले.
यावेळी उपस्थित बांधवांना राखी बांधण्यात आली. कार्यक्रमाला ब्रह्माकुमार श्रीकांत भाई, ब्रह्माकुमार दत्तात्रय भाई, ब्रह्माकुमार मनोहर भाई, रजपूत भाई, बसवराज सदलगी, दानाप्पा कट्टीमनीं सह मोठ्या संख्येने बंधू-भगिनी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta