
बेळगाव : कर्नाटक सरकारने प्राथमिक शाळांमधील १५,००० शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी व उर्दू माध्यमातील उमेदवारांना स्थान न दिल्याने, मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या अन्यायाविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांनी तातडीने आवाज उठवत संबंधित प्रशासनाला निवेदन दिले होते.
यानंतर या प्रश्नासाठी सीमाभागातून व्यापक आंदोलन उभे राहिले. मराठी उमेदवारांच्या न्याय्य हक्कांसाठी खानापूरचे गणपती बावकर व मोहन पाटील यांनी बेंगळुरू येथे तब्बल आठ ते दहा दिवस ठाण मांडून लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. तसेच या गंभीर प्रश्नावर विधानसभेतही आवाज उठविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
शिक्षक भरती प्रक्रियेत केवळ कन्नड माध्यमातील शाळांसाठी पदे जाहीर करण्यात आली होती, तर मराठी व उर्दू माध्यमातील शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. ही बाब युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच, मराठी व इतर अल्पसंख्याक माध्यमातील शाळांमध्ये तातडीने शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने निवेदनाद्वारे जोरदार मागणी करण्यात आली.
या सातत्यपूर्ण संघर्षाची आणि पाठपुराव्याची दखल घेत अखेर मराठी माध्यमासाठी २०० शिक्षक पदांना कर्नाटक सरकारकडून मान्यता देण्यात आली. मराठी शिक्षक भरतीसाठी यशस्वी प्रयत्न करून हा लढा निर्णायक टप्प्यापर्यंत नेणारे खानापूरचे गणपती बावकर व मोहन पाटील यांचा महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागतर्फे आज विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे आणि चिटणीस अभिजित मजुकर उपस्थित होते.
हा केवळ दोन कार्यकर्त्यांचा सन्मान नसून, मराठी भाषा, मराठी शिक्षण आणि सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक योद्ध्याच्या संघर्षाचा प्रातिनिधिक स्वरूपात गौरव आहे!

Belgaum Varta Belgaum Varta