
निस्पृह वृत्तीने समाजसेवा करणारे, जातिवंत शेतकरी कै. यशवंत रामलिंग गुरव (वय 86) यांचे दि. 22 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने गावच्या सामाजिक कार्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
कै. गुरव यांचा जन्म 1 जानेवारी 1941 रोजी किणये (ता. बेळगाव) येथे गरीब शेतकरी कुटुंबात झाला. वयाच्या दहाव्या वर्षीच पितृछत्र हरपल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली. लहान वयात गावात गडी म्हणून काम करून त्यांनी आई व भावंडांचा सांभाळ केला. स्वतःला शिकता आले नाही, तरी भावंडांना शिकवले. त्यातील एक भाऊ भारतीय सैन्यात भरती झाला.
वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचा विवाह येळ्ळूर येथील जानकी यांच्याशी झाला. त्यांना दोन मुले व दोन मुली अशी चार अपत्ये. थोरले चिरंजीव बाळाराम गुरव यांनी सैन्यात 28 वर्षे सेवा करून सुभेदार मेजर म्हणून निवृत्ती घेतली आहे.
कै. गुरव हे उत्कृष्ट आचारी म्हणूनही प्रसिद्ध होते. गावातील लग्नकार्य असो वा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, स्वयंपाकाची धुरा ते प्रामाणिकपणे सांभाळत. त्यांच्या हातच्या महाप्रसादाची चव आजही अनेकांच्या लक्षात आहे.
त्यांनी गावचे पंच म्हणूनही उल्लेखनीय काम केले. आयुष्यात सुबत्ता आली तरी त्यांच्या पाय जमिनीवरच राहिले. गर्वाचा लवलेशही नसलेले आणि कोणतेही व्यसन नसलेले ते गावचे ‘दादा’ म्हणून सर्वपरिचित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!
– शिवाजी हसनेकर, उचवडे

Belgaum Varta Belgaum Varta