बंगळूर : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून होणार आहे. १५ ते २६ जुलै या कालावधीत नऊ दिवसांचे हे पावसाळी अधिवेशन असेल. विधानसभेचे सचिव एम. के. विशालाक्षी यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, राज्यपालांनी १५ जुलैला सकाळी ११ वाजता अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिले आहेत.
२६ जुलैनंतर अधिवेशनाची मुदतवाढ घ्यायची की संपवायचे याबाबत सभागृहाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधिमंडळाचे अधिवेशन घेण्याची तारीख ठरविण्याचे अधिकार
मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यानुसार अधिवेशनाची तारीख निश्चित करून राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवली, त्याला त्यांनी परवानगी दिली.
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. या निवडणुकीत मिळविलेल्या विजयामुळे भाजप आणि धजद दोघेही सरकारला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळी मदतनिधी वितरणास झालेली दिरंगाई, पेट्रोल, डिझेल, दुधासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ, या मुद्यांचा सरकारविरोधात मोठे शस्त्र म्हणून वापरण्याची तयारी युतीने केली आहे.