बेंगळुरू : माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी काल मंत्रिपद न मिळाल्याच्या निषेधार्थ मी सभागृहात जाणार नाही असे थेट विधान केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याचीही शक्यता आहे.
पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने अधिवेशनात न जाता पक्षाविरोधात उघडपणे बोलल्याने पक्षांतर्गत मोठा पेच निर्माण झाला आहे. शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जाणार्या भाजपामध्ये सध्या गोंधळ उडाला आहे. मंत्रिपद न मिळालेले सगळेच असंतोषातून सभागृहापासून दूर राहिले, तर कसे होणार असा सवाल उभा केला जात आहे.
दरम्यान, काल माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्या रुपात समोर आला आहे. मंत्रिमंडळात अद्याप स्थान न मिळाल्यामुळे त्यांनी भाजपाच्या प्रदेश नेतृत्वाला लक्ष्य करत अधिवेशनास अनुपस्थित राहण्याचा इशारा दिला आहे. ईश्वरप्पा शिवमोग्गा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यांच्यावर ग्रामविकास मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र एका कंत्राटदाराने ईश्वरप्पा यांनी 40 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप करत आत्महत्या केली होती. याच कारणामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
माझा मंत्रिमंडळात अद्यापही समावेश न केल्यामुळे मी निराश आहे. याच कारणामुळे मी विधिमंडळ अधिवेशनास उपस्थित राहणार नाही. माझ्यावर काही आरोप करण्यात आले होते. मात्र आता मी निर्दोष असल्याचा निर्वाळा तपास संस्थांनी दिला आहे. त्या प्रकरणात माझी कोणतीही भूमिका नव्हती, हे कर्नाटकमधील जनतेला माहिती आहे. तो खटला बंद करून मला क्लीनचीट देण्यात आलेली आहे. माझे निर्दोषत्व सिद्ध झाल्यानंतर माझा परत मंत्रिमंडळात समावेश केला जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप तसे झालेले नाही. मला अजूनही खात्री आहे की माझा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल, असे ईश्वरप्पा म्हणाले आहेत.
मी निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यानंतर मला मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल असे आश्वासन माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांनी दिले होते, त्यांना याबाबत विचारले पाहिजे, असेही ईश्वरप्पा म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta