बेंगळुरू : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि धजदला यांनी आपल्या कर्नाटकमधील युतीवर शिक्कामोर्तब केले आहे. यासंबंधीची माहीती भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी शुक्रवारी दिली. या युतीनुसार कर्नाटकातील लोकसभेच्या चार जागा धजदला देण्याचे अमित शाह यांनी मान्य केले आहे. धजदचे सुप्रीमो एच. डी. देवेगौडा यांनी नुकतीच भाजपचे प्रमुख जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन भाजप आणि धजदला युतीचे संकेत दिले होते.
शहरातील काँग्रेस सरकारच्या जनविरोधी आणि शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत शहरातील फ्रीडम पार्क येथे भाजप पक्षाच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मी भाजप-धजद युतीचे स्वागत करतो, या युतीद्वारे भाजप अधिक जागा जिंकेल. या आघाडीतून बरीच ताकद आली आहे, असे सांगून ते म्हणाले की, राज्यातील २० ते २५ मतदारसंघात आमचा विजय निश्चित आहे. आतापासून आम्ही घरी बसण्याऐवजी राज्यभर फिरणार आहोत. लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्यावर आमचा भर आहे.
बोम्मईकडून स्वागत
माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी भाजप-धजद युतीवर भाष्य केले. मी युतीचे स्वागत करतो. कर्नाटक वाचवण्यासाठी युती करण्यात आली. विरोधी पक्ष अर्थातच एकजूट आहेत, असे ते म्हणाले.
देवेगौडा-शहा चर्चा
भाजप-धजद युतीबाबत चार सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर युतीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. युतीच्या चर्चेदरम्यान माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी धजदला ४-५ जागा सोडण्याची अट ठेवली होती आणि अमित शहा यांनी ती मान्य केली आहे. त्यानुसार हसन, तुमकूर, मंड्या, चित्रदुर्ग आणि कोलार मतदारसंघ धजदला देण्याची विनंती करण्यात आली असून मंड्या वगळता उर्वरित मतदारसंघ धजदला देण्याचे शहा यांनी मान्य केले आहे, मात्र मंड्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल.
दोन असहाय्यक एकत्र: शेट्टर
धजद-भाजप युतीवर भाष्य करताना, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी, दोन असहाय लोकांनी युती केली आहे, असा टोला लगावला.
हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजप आणि धजद गेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांशी लढले होते आणि आता ते युतीसाठी तयार आहेत. सोयीस्कर असताना युती करायची आणि गैरसोयीचे असते तेव्हा माघार घ्यायची, लोकांचा या दोन्ही पक्षांवर विश्वास नाही, भाजप-धजद युतीमुळे त्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे, असे ते म्हणाले.
सुरुवातीपासूनच युती- सुरेश
भाजप-धजद सुरुवातीपासूनच एकत्र होते, आधी अंतर्गत समझोता करून निवडणूक लढवणारे भाजप-धजद आता उघडपणे एकत्र आले आहेत. या आघाडीचा काँग्रेस पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही, असे मंत्री भैरती सुरेश म्हणाले.