शिमोगा येथे जाहीर सभेत घणाघात
बंगळूर : काँग्रेसने दक्षिणेकडील राज्य आपले एटीएम बनवले आहे. प्रत्येक निवडणुकीपूर्वी काँग्रेस खोटे बोलण्यात माहिर बनते आणि कर्नाटकातही तेच करत आहे, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार आरोप केला. ते शिमोगा येथे सोमवारी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
शिमोगा येथे जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, “कर्नाटकमध्ये सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस एकामागून एक खोटे बोलत आहे. कधी ते केंद्राला दोष देतात, कधी मोदींवर आरोप करतात तर कधी त्यांच्या अपयशासाठी इतर पक्षांना दोष देतात. कारण काँग्रेसला कधीच जनतेची सेवा करायची नाही, त्यांना फक्त जनतेची लूट करायची आहे. म्हणूनच त्यांनी कर्नाटकचे एटीएम बनवले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, इंडिया युतीने शक्ती नष्ट करण्याची शपथ घेतली पण शक्तीवरचा ‘वार’ म्हणजे महिला, मुली आणि माँ भारतीवर ‘वार’.
“काल शिवाजी पार्क (मुंबईत) मधून शक्ती नष्ट करण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती दु:ख झाले असेल… नारी शक्ती का यही आशीर्वाद मेरा सबसे बडा कवच है… इंडिया युतीच्या लोकाना ही शक्ती नष्ट करायची आहे. त्यांना माँ भारतीच्या वाढत्या शक्तीचा तिरस्कार आहे… शक्तीवरील ‘वार’ म्हणजे स्त्रिया, मुली, मां भारती यांच्यावर ‘वार’, असे ते म्हणाले.
“चार जून को इंको पता लग जायेगा की शक्ति को लालकरने का मतलब क्या होता है. काँग्रेस हा असा पक्ष आहे जो सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाईल. इंग्रज निघून गेले, पण काँग्रेसने फूट पाडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची मानसिकता सोडलेली नाही. …काँग्रेसने आधी देशाचे विभाजन केले, जातीच्या आधारावर, समुदायावर आधारित, आणि धर्म, प्रदेश आणि भाषेच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडली आणि सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसने देशाचे विभाजनही केले, परंतु तरीही, काँग्रेस आपल्या फुटीरतावादी मानसिकतेने यावर समाधानी नाही. काँग्रेसने पुन्हा देशाचे विभाजन करण्याचा धोकादायक खेळ सुरू केला आहे, असे ते म्हणाले.
कर्नाटकात भाजपला जे प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे त्यामुळे संपूर्ण ‘इंडिया’ आघाडीला धक्का बसला आहे, असे मोदी म्हणाले.
येडियुरप्पांचे कौतुक
“कर्नाटकच्या कानाकोपऱ्यातून भाजपला ज्या प्रकारचे प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे संपूर्ण ‘इंडिया’ आघाडीला धक्का बसला असेल. बी. एस. येडियुरप्पा यांनी त्यांचे बहुतांश दिवस शिमोगामध्ये घालवले आहेत. शिमोगा ही त्यांची ‘तपोभूमी’ आहे,” असे पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित करताना सांगितले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, एनडीएला ४०० हून अधिक जागा मिळवून देण्याची मोठी जबाबदारी कर्नाटकच्या मतदारांवर आहे. “४ जून को ४०० पार या मिशनमध्ये कर्नाटकच्या मतदारांची मोठी जबाबदारी आहे. विकसित भारत, विकसित कर्नाटकसाठी ४०० पार आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गृह जिल्हा गुलबर्गा येथे कर्नाटकातील पहिली निवडणूक सभा झाल्यानंतर दोन दिवसांत मोदींची ही दुसरी जाहीर सभा आहे. यावेळी भाजपचे दिग्गज नेते येडियुरप्पा यांच्या गृहजिल्ह्यात जाहीर सभा झाली.
मोदींचे भव्य स्वागत
शिमोगा लोकसभा उमेदवार बी. वाय. राघवेंद्र, दावणगेरे लोकसभा उमेदवार गायत्री सिद्धेश्वर यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खुल्या वाहनातून व्यासपीठावर आगमन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाच्या घोषणांबरोबरच, ‘मोदी मोदी’ ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या.
मेळाव्याला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याला माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह राज्यातील दिग्गज भाजप नेते उपस्थित होते. याशिवाय दक्षिण कन्नड भाजपचे उमेदवार ब्रिजेश चौटा, बंगळुर ग्रामीणचे उमेदवार डॉ सी. एन. मंजुनाथ, दावणगेरेचे उमेदवार गायत्री सिद्धेश्वर, उडुपी चिकमंगळूरचे भाजप उमेदवार कोटा श्रीनिवास पुजारी, शिमोगा भाजपचे उमेदवार बी. वाय. राघवेंद्र उपस्थित होते.