
बेळगाव : शहरातील कपिलेश्वर मंदिरामागील ऐतिहासिक विहिरीची अवस्था अतिशय धोकादायक बनली आहे. रविवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर सोमवारी पुन्हा विहिरीच्या संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने त्यावेळी परिसरात कोणीही उपस्थित नसल्याने दुर्घटना टळली.
रविवारी सकाळी शिवम आणि परशुराम ही पोहण्यासाठी गेलेली दोन मुले पोहून झाल्यावर विहिरीच्या कठड्यावर बसली होती. यावेळी ती बसलेल्या भिंतीचा भाग अचानक कोसळल्याने ती मुले विहिरीत पडली आणि त्यांच्या अंगावर कोसळलेल्या भिंतीचा भाग पडून त्या मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रशासनावर तीव्र टीका झाली होती.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने तातडीने उपाययोजना करत संपूर्ण विहीर परिसराला बॅरिकेट्स लावून विहीर परिसरात नागरिकांच्या प्रवेशाला बंदी घातली आहे. तसेच अतिधोकादायक ठरलेल्या तीन घरांना सील करण्यात आले आहे.
परिसरातील किमान चार ते पाच घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले असून तेथील रहिवासी भीतीमुळे स्थलांतर करू लागले आहेत.
ही विहीर व परिसर स्वातंत्र्यपूर्व काळातील असून तो गोडसे कुटुंबाच्या खासगी मालकीचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भिंतीच्या दुरुस्तीची मागणी होत असतानाही, खासगी मालकीचा प्रश्न पुढे करत प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. मात्र, दोन लहान मुलांच्या मृत्यूने जागे झालेले महापालिका प्रशासन आता नक्कीच काहीतरी ठोस पाऊले उचलेल असे वाटू लागले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta