

बेळगाव : रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी कपिलेश्वर मंदिराच्या पाठीमागील विहिरीत एक दुर्घटना घडली, त्यामध्ये पोहायला गेलेल्या दोन 7 व 10 वर्षे वय असलेल्या चिमुकल्यांचा कठडा कोसळून बळी गेला. या जीर्ण झालेल्या विहिरीत अनेकजण आत्महत्याही करतात व काही निष्पापांचे बळीही जात आहेत,
नागरिकांतून प्रश्न विचारला जात आहे की याला जबाबदार कोण? ही जागा गोडसे कुटुंबियांच्या मालकीची होती पण त्यांनी ती बेळगाव महानगर पालिकेकडे हस्तांतरित केली आहे असे त्यांचे म्हणणे आहे, 2016 व 2022 ला ही प्रक्रिया जर झाली असेल तर हस्तांतर का रखडले व महानगर पालिका प्रशासन आपली जबाबदारी का झटकत आहेत असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने आज जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार होते, पण जिल्हाधिकारी पूर्वनियोजित कामामुळे कार्यालयात उपस्थित नसल्याने बेळगाव विभागाचे प्रादेशिक आयुक्त श्रीमती के. एम. जानकी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी युवासमिती सीमाभागचे पदाधिकारी, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले यांच्यासह स्थानिक नागरिक व गोडसे परिवारातील सदस्यही उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta