

बेळगाव : स्वामी विवेकानंद यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या किल्ल्यातील रामकृष्ण मिशन आश्रमाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने धार्मिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन दि. ८ ते १० मे दरम्यान किल्ल्यातील आश्रमात करण्यात आले आहे.
स्वामीजींनी १६ ते २७ ऑक्टोबर १८९२ या कालावधीत बेळगावमध्ये १२ दिवस वास्तव्य केले. सुरुवातीचे तीन दिवस ते रिसालदार गल्लीतील श्री. भाटे यांच्या घरी आणि त्यानंतर नऊ दिवस किल्ल्यातील श्री. हरिपाद मित्र यांच्या घरी राहिले होते.
रामकृष्ण मठ आणि मिशन बेलूर मठाचे उपाध्यक्ष स्वामी सुहितानंद यांच्या उपस्थितीत आणि दिव्य सानिध्यात रौप्य महोत्सव कार्यक्रम पार पडणार आहे.
पहिल्या दिवशी ८ मे रोजी सकाळच्या सत्रात श्री रामकृष्ण मननम्
कार्यक्रमात अनेक ठिकाणाहून आलेले आश्रमाचे स्वामीजी आपले विचार मांडणार आहेत. दुपारच्या सत्रात डॉ. एस. पी. गुरूदास हे हरिकथा सादर करणार आहेत. सायंकाळी ६. ४५ वाजता प्रख्यात गायिका संगीता कट्टी कुलकर्णी यांचा शरणदास वाणी हा संगीत कार्यक्रम होणार आहे.
दुसऱ्या दिवशी दि. ९ मे रोजी सकाळच्या सत्रात श्री शारदादेवी मननम् या कार्यक्रमात स्वामी सुहितानंदजी महाराज शारदा माताच्या जीवनावर व्याख्यान देणार आहेत. दुपारच्या सत्रात विद्वान निनाद अशोक नृत्य अलंकार रोहित माने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. सायंकाळी प्रख्यात हिंदुस्थानी गायक रघुनंदन पणशीकर यांचा भजनसंध्या कार्यक्रम होणार आहे.
तिसऱ्या दिवशी दि. १० मे रोजी स्वामी विवेकानंद मननम् कार्यक्रम होणार आहे. पूजा, भजन आणि रामकृष्ण होम आदि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर स्वामी सुहितानंदजी महाराज यांचे आशीर्वचनपर भाषण होणार आहे. दुपारच्या सत्रात स्वामी विवेकानंदाच्या कवनावर आधारित कार्यक्रम डॉ. दत्तात्रय वेलणकर आणि डॉ. एच. एन. मुरलीधर सादर करणार आहेत. सायंकाळी पंडित पुरबयान चटर्जी यांच्या सतार वादन कार्यक्रमाने रौप्य महोत्सव कार्यक्रमाची सांगता होणार आहे. बेळगावकर जनतेने तीन दिवस कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन बेळगाव रामकृष्ण मिशन आणि आश्रमचे सचिव आत्मप्राणानंद यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta