बेळगाव : कौटुंबिक वातावरणानंतर मुलांचे पहिले पाऊल ज्या ठिकाणी पडते, ते म्हणजे नर्सरी शाळा. त्यामुळे बालकांच्या जडणघडणीत आणि संस्कारक्षम शिक्षणात नर्सरी शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. याच उद्देशाने भांदूर गल्ली येथील स्वीटी नर्सरीतर्फे श्री साई दत्त मंदिर, भांदूर गल्ली येथे अक्षराभ्यास संस्कार कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून वार्ड क्रमांक १० च्या नगरसेविका वैशाली भातकांडे, समाजसेवक सिद्धार्थ भातकांडे तसेच पत्रकार राधिका सांबरेकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल काळभैरव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकातून अक्षराभ्यास संस्काराचे महत्त्व विशद केले. त्यानंतर पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा पारंपरिक पद्धतीने अक्षराभ्यास संस्कार संपन्न झाला. पालकांनीही पुरोहितांच्या सूचनांनुसार आपल्या पाल्यांकडून अक्षरलेखनाची पूजा करून घेतली.
यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक बालगीतांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास शाळेचे व्यवस्थापक गुरुप्रसाद काळभैरव, कमिटी सदस्य कीर्ती पाटील, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बालकांच्या शैक्षणिक प्रवासाची मंगल सुरुवात करणारा हा अक्षराभ्यास संस्कार कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
Belgaum Varta Belgaum Varta