
बेळगाव : प्रेमप्रकरणाच्या वादातून एका कुटुंबाच्या घरावर तलवारी व काठ्यांसह हल्ला करून महिलेच्या हत्येचा प्रयत्न, घराची तोडफोड आणि सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी मारिहाळ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
भरम्यानट्टी येथील भिमप्पा यल्लप्पा नाईक यांनी मारिहाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा यल्लप्पा नाईक याने जैतूनमाळ येथील नागव्वा बसप्पा नाईक हिच्यासोबत प्रेमसंबंधातून तिला दोन-तीन दिवसांपूर्वी सोबत घेऊन गेल्याचा राग आरोपींनी मनात धरला होता.
याच कारणावरून २८ जून रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी तलवारी व काठ्या घेऊन फिर्यादीच्या घरात घुसले. आरोपी नागराज बाळप्पा नाईक याने फिर्यादीची पत्नी दुर्गव्वा हिच्यावर तलवारीने वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्गव्वा यांनी प्रसंगावधान राखून बाजूला झाल्याने त्यांचा जीव वाचला. त्यानंतर इतर आरोपींनीही फिर्यादी व त्यांच्या मुलाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
हल्लेखोरांनी घरातील टीव्ही, कॉट, सोफा तसेच अन्य घरगुती वस्तूंची तोडफोड केली. घराच्या छतावरील कौलेही फोडल्याने सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार आहे.
या प्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९२/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणात नागराज बाळप्पा नाईक (३३), रवी सत्तेप्पा बिजगट्टी (४०) आणि ईश्वर शिवप्पा मुचंडी (२२) या तिघांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी (३० जून) त्यांना न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास मारिहाळ पोलीस करीत असून, आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त, डीसीपी (कायदा व सुव्यवस्था) आणि एसीपी (ग्रामीण) यांनी कौतुक केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta